
भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल आमच्या पैशातून चालतात या वक्तव्याने वाद निर्माण केला आह. विरोधकांसह जनतेचा संताप त्यांच्यावर व्यक्त होत आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या वादग्रस्त विधानांची जणू काही शर्यतच लागली आहे. कुणी कुणावर शाब्दिक तोफा डागत आहे, तर कुणी जिभेवरील ताबाच हरवत आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफीचा धगधगत असलेला मुद्दा आणि ग्रामीण भागातील वाढता असंतोष. यामध्ये आता आणखी पेट घालणारे वक्तव्य भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. त्यांचे शब्द होते ‘शेतकऱ्यांचे कपडे, चप्पल, मोबाईल आमच्या पैशातून चालतात’ हे वाक्य उच्चारताच राज्याच्या राजकारणात वीज चमकली. सोशल मीडियावर ही क्लिप वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि संतप्त प्रतिक्रियांचा धुमाकूळ सुरू झाला.
विरोधकांच्या मते, हे विधान शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर थेट घाव घालणारे आहे. या वक्तव्यानंतर विरोधकांनी थेट मोर्चा उघडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी थेट हल्लाबोल करत म्हटलं, लोणीकर तुमच्या बोलण्यावरून भाजपची मानसिकता महाराष्ट्राने ओळखली आहे. अन्नदाता हा या जगाचा बाप आहे हे विसरू नका. देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगितले की, सत्तेच्या मोहाने हे लोक विसरले की, ज्याच्या घामाच्या थेंबांवर आपली सत्ता टिकते तो बळीराजाच आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमधून शेतकऱ्यांना तुच्छ लेखण्याची मानसिकता सातत्याने दिसून येते.

Harshwardhan Sapkal : आधी शिस्त होती, आज शिस्तच भ्रष्टाचारात गेली
भाजपची स्पष्ट भूमिका
आता ही मस्ती फार काळ टिकणार नाही, बळीराजाचं फडतूसही त्यांच्या राजकारणाला पुरेसं ठरेल.फक्त अनिल देशमुख यांनीच नाही, तर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील लोणीकरांवर सडकून टीका केली. प्रत्येक जण एकच सवाल विचारतोय शेतकऱ्यांच्या अपमानाचं हे नवीन राजकारण का? राजकीय वातावरण इतकं तापलं की अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही स्पष्ट भूमिका घ्यावी लागली. त्यांनी सांगितले की, असा अपमान करणं पक्षाच्या नीतीला मंजूर नाही. कोणत्याही नेत्याला असं बोलण्याचा अधिकार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत लोणीकरांना थेट इशारा दिला. वाढत्या दबावामुळे अखेर लोणीकरांनी माफी मागितली खरी, पण प्रश्न अजूनही तसाच आहे केवळ माफीनाम्याने शेतकऱ्यांच्या जखमा भरतील का? राज्यात कर्जमाफीचा मुद्दा पेटलाच होता. त्यात या विधानामुळे राजकीय वादळ आणखी भडकले. आजही शेतकरी सरकारकडे पाहतोय हे राजकारण आमच्या जखमांवर मीठ चोळत राहणार का? किंवा खरंच कधीतरी अन्नदात्याला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातील का? राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण या सगळ्यात बळीराजा मात्र नेहमीप्रमाणे गारठलेल्या जमिनीवर, निसर्गाच्या लहरीपणात आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेलाच आहे.