
अनेक वर्षांची युती असताना एकमेकांना अत्यंत साधेपणानं भेटणाऱ्या भाईजी अन् नानाभाऊंनी त्या दिवशी गळाभेट घेतली. त्यानंतर काही तरी घडणार असं बोललं जात होते. त्याची प्रचिती भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत आली.
महाराष्ट्रात अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. आजच्या घडीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले खासदार प्रफुल पटले त्यावेळी काँग्रेससोबत युतीमध्ये होते. त्यामुळं नाना पटोले हे नाव आणि चेहरा त्यांच्यासाठी नवीन नाही. भाईजी आणि नानाभाऊ नेहमीच भेटायचे. पण लाखांदूर येथील शंकरपटात वेगळचं चित्र दिसला. भाईजी आणि नानाभाऊ यांची चक्क एकमेकांची गळाभेट घेतली. त्यानंतर सगळ्यांच्या तोंडूनच एकच वाक्य बाहेर पडलं ‘कुछ तो गडबड है दया.’ काही तरी पडद्याआड शिजतय असं सगळेच बोलत होते. मात्र त्याची प्रचिती आता भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत आल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्षपद भाजपकडं येतायेता पुन्हा काँग्रेसकडं आलं. त्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर विषय समिती सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य अचानक अनिल कपूरसारखे हातावर ‘घड्याळ’ बांधून ‘मिस्टर इंडिया’ झालेत. भंडाऱ्यातीलच एका नेत्यानं त्यांना गायब केलं. आता एवढा मोठा गेम भाईजींचा वरदहस्त असल्याशिवाय ‘आपला भाऊ’ करूच शकत नाही, असा आरोप आता भाजपकडून होत आहे.

नेमकं झालं काय?
राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या खूपच जवळीक आहे. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत एकनाथ शिंदे यांचं तळ्यातमळ्यात सुरू होतं. पण अजितदादांनी कोणी घेवा अगर न घेवो मी तर शपथ घेणार, असं सांगितलं होतं. त्यामुळं जमलं गड्या असं सगळ्यांना वाटत होतं. पण अचानक असं काय घडलं की, भाईजी नाराज झालेत, असा प्रश्न सगळ्यांना आता पडला आहे. भाईजींनी आतापर्यंत भाजपच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लाऊन कामं केलं. पण ‘घड्याळी’चे काटे उलटे का फिरले असा सवाल आता भाजपचे पदाधिकारी उपस्थित करीत आहेत.
लाखांदूरमध्ये नाना पटोले यांनी भाईजींची गळाभेट घेतली. त्यानंतर नानाभाऊंनी कसा कोणता मुद्दा भाईजींच्या गळ्यात उतरविला की, ते महायुतीत मिठाचा खडा टाकायला तयार झाले, असं भाजपला वाटत आहे. गोंदियात बसून भाईजींनी ‘रिमोट’चं बटण दाबलं. त्याची ‘रेंज’ इकडे भंडाऱ्यातील ‘आपल्या भाऊ’नं पकडली. भाईजींच्या सांगण्यावरूनच ‘भाऊ’नं भंडाऱ्यात खास गाडी पाठवून जिल्हा परिषदेतील ‘हम पाच’ गोळा केले. त्यानंतर अख्खी जिल्हा परिषदच काँग्रेसच्या ताब्यात गेली. आता उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पण ते देखील काय कामाचं असा प्रश्न भाजपमध्ये सर्वांना पडला आहे.
भाईजी आणि नानाभाऊ यांनी गळाभेट घेतल्यानंतर राजकीय चुलीवर ठेवलेली खिचडी भंडारा जिल्हा परिषदेत शिजलेली दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत जे काही केलं, त्यामुळं सध्या भाजप चांगलीच दुखावलेली आहे. उतरलेल्या चेहऱ्यानं जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आता बोलू लागले आहे ‘भाईजी ये तुमने क्या किया..’