
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाला 80 दिवस उलटले आहेत. या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, यातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली. विशेषतः, धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड हाच हत्या कटाचा प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला.
हत्येप्रकरणाशी संबंधित काही धक्कादायक फोटो सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. लोकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला गेला आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जाऊ लागली. अखेर, चार मार्चरोजी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

विरोधकांचा हल्लाबोल
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा कोणताही थेट सहभाग असल्याचे कोणत्याही तपासातून समोर आलेले नाही.’
इथेच खरी गंमत आहे, जर मुंडेंचा या प्रकरणाशी थेट संबंध नसेल, तर अचानक राजीनाम्याची वेळ का आली? विरोधकांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. त्यांच्या मते, ही फक्त प्रतिमा वाचवण्याची खेळी आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचा दावा केला जातोय, पण हा नैतिकतेचा विजय आहे की राजकीय डॅमेज कंट्रोल? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
न्यायप्रक्रियेवर पक्षाचा विश्वास
राष्ट्रवादी काँग्रेसने या राजीनाम्याच्या निमित्ताने अजित पवार यांच्या निर्णयशक्तीचे कौतुक केले. ‘यापूर्वीही अजित पवार यांनी नैतिक मुद्यांवर स्वतःहून राजीनामा देऊन आदर्श निर्माण केला होता. त्याच धर्तीवर धनंजय मुंडेंनी हा निर्णय घेतला आहे.’ पक्षाने या संपूर्ण प्रकरणातून हा संदेश द्यायचा प्रयत्न केला की, कायदा आणि न्यायप्रक्रियेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
विरोधकांना यात काही वेगळाच सुगावा लागत आहे. जर तुमचा पक्ष नैतिकतेला एवढा प्राधान्य देत असेल, तर मग गुन्हेगारांशी संबंध असलेल्या नेत्यांना आधीच का बाजूला केले जात नाही? असा जोरदार प्रश्न विचारला जातोय. एकीकडे अजित पवार नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आल्याचे बोलत असले, मात्र दुसरीकडे स्वतः मुंडे यांनी वैद्यकीय समस्यांमुळे राजीनामा दिला असे सांगितले. यात नेमकं खरं काय, हे कुणालाच ठाऊक नाही.
वादाला तोंड
संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी म्हणून समोर आला, आणि त्याचे धनंजय मुंडेंशी असलेले जवळचे संबंध गुपित राहिले नाहीत. त्यामुळेच, हा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला. “सरकार काय खरंच आरोपींना शिक्षा करणार आहे की हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय?” असा सवाल आता लोक करत आहेत.
धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे. पण हा संदेश लोकांनी कितपत स्वीकारला? हाच मोठा प्रश्न आहे.
आक्रमक मोर्चा
राजीनाम्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. ही केवळ मलमपट्टी आहे, मूळ मुद्दा दडपण्याचा प्रयत्न आहे, असे आरोप करत विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. जर एखाद्या नेत्याचा त्यांच्या निकटवर्तीयांशी काही संबंध असेल, तर नैतिकतेचा दाखला देऊन राजीनामे देण्याऐवजी, त्या नेत्यावर थेट कारवाई का केली जात नाही.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, महायुती सरकारने या प्रकरणाचा प्रभाव कमी करण्यासाठी हा राजीनामा स्वीकारला. पण हे पुरेसे आहे का? विरोधकांचा आक्रमक मोर्चा आणि या प्रकरणाचा वाढता रोष पाहता, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही हे प्रकरण इतक्यात शांत होईल असे वाटत नाही.