महाराष्ट्र

BJP State President : प्रदेशाध्यक्षाच्या सिंहासनावर कुणाची लागणार मोहर ?

Maharashtra : नव्या नेतृत्वासाठी दिल्लीहून आलेली हालचाल 

Author

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अंतर्गत हालचालींना वेग आला असून दिल्लीकडून निर्णायक टप्प्यावरचा डाव टाकला गेलाय. किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाची घोषणा जवळ आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील यशस्वी विजयानंतर आता पक्षाचा मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे वळला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः भाजप गोटात एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे, तो म्हणजे नवा प्रदेशाध्यक्ष कोण?

प्रदेशाध्यक्ष पदाच्या प्रश्नाचे उत्तर जरी अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले, तरी दिल्लीपासून मुंबईपर्यंत पक्षाच्या अंतर्गत गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात सामील करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले आणि त्या रिक्त खुर्चीभोवती सध्या भाजपचे सर्वोच्च नेतृत्व एक नवा चेहरा शोधण्यात व्यग्र आहे.

निरीक्षक नियुक्ती

या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड म्हणजे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती. ही केवळ एक औपचारिक नेमणूक नाही. या नियुक्तीमुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला अधिकृत रूप लाभले आहे. भाजपने रिजिजूंवर जबाबदारी सोपवली म्हणजेच, निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच संघटनात्मक नवी दिशा निश्चित केली जाणार हे स्पष्ट होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असताना दोन नावं विशेष गाजत आहे. त्यामध्ये एक नाव म्हणजे रवींद्र चव्हाण यांचे.

रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या एकनाथ शिंदे सरकारमधील माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून भक्कम कामगिरी केली होती. कोकणात भाजपने मिळवलेल्या राजकीय मुसंडीमागे चव्हाण यांचा मोठा वाटा मानला जातो. याशिवाय, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने दिल्लीतील उच्च नेतृत्वाच्या समीकरणांतही त्यांना विशेष स्थान आहे. भाजप जर मराठा समाजातील प्रतिनिधीला संधी देण्याच्या तयारीत असेल, तर चव्हाण यांचे नाव सर्वाधिक प्राधान्याने पुढे येते आहे.

Nitin Gadkari : आत्मनिर्भर भारतासाठी आर्थिक प्रगतीसह संस्कार आवश्यक

दुसरे मजबूत नाव

या शर्यतीत डॉ. संजय कुटे यांचेही नाव पुढे आहे. मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे पक्षसंघटनेत त्यांना जबाबदारी देण्यात यावी, अशी चर्चा आहे. विदर्भातील बळकट संघटना, स्पष्ट वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, यामुळेही त्यांचं नाव नेतृत्वासाठी योग्य मानलं जात आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती – एक पद, या तत्वानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांच्या कडचं अध्यक्षपद आता दुसऱ्याकडे सोपवण्यात येणार हे नक्की. ही जागा केवळ सन्मानाची नसून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या रणनितीचा किल्ला ठरणार आहे.

बाहेरचा आघाडीचा मोर्चा

भाजपमध्ये सध्या नेतृत्व परिवर्तनाच्या नावाखाली नेतृत्वाच्या तऱ्हेतऱ्हेच्या संधी शोधल्या जात आहेत. प्रदेशाध्यक्ष पद हे केवळ एक संघटनात्मक पद नाही; हे राज्याच्या राजकारणाला दिशा देणारं प्रभावी नेतृत्व ठरू शकतं. त्यामुळे ‘कोण’ हा प्रश्न जितका उत्सुकतेचा आहे, तितकाच त्यामागचा राजकीय कॅल्क्युलेशन देखील गहन आहे. भाजपच्या अंतर्गत सूत्रांनुसार, पुढील आठवड्यातच नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. किरेन रिजिजू यांच्या निरीक्षणाखाली वरिष्ठ नेतृत्व सध्या सर्व उमेदवारांचे प्रोफाइल, भूतकाळातील योगदान, सामाजिक प्रतिनिधित्व आणि आगामी निवडणुकीतील उपयोगिता अशा सगळ्या पैलूंवर सखोल विचार करत आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या संघटनात्मक योजनांच्या पार्श्वभूमीवर, प्रदेशाध्यक्ष पदाची निवड केवळ “नेतृत्व नेमणूक” नसून, ही एक प्रकारची रणनीतिक पुनर्संचटना आहे. भाजपसारख्या शिस्तप्रिय आणि संघटनात्मक निर्णयांवर चालणाऱ्या पक्षासाठी ही निवड आगामी निवडणुकांचे भविष्य ठरवू शकते. प्रदेशाध्यक्ष पदाची निवड ही आता केवळ औपचारिकता नसून, भाजपच्या आगामी राजकीय विजयाच्या रणधुरंधराचा शोध आहे. साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष त्या निर्णयावर खिळून आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!