
16 जून रोजी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात साजरा होणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि गुणवत्तेसाठी नव्या उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात केवळ घंटानादाने नव्हे, तर आनंद, आत्मीयता आणि प्रेरणादायी वातावरणात होणार आहे. 16 जून 2025 रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करत नव्या वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सवशैलीत होणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने आणि मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या नेतृत्वाखाली हे शैक्षणिक पर्व नव्या विश्वासाने आणि गुणवत्ता-संवेदनशीलतेने पुढे सरकणार आहे.
राज्यातील 497 शासकीय व 554 अनुदानित आश्रमशाळांमध्ये नववर्षाचा श्रीगणेशा हा केवळ औपचारिक न राहता, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उत्साह निर्माण करणारा ठरेल. प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थी सन्मानाने स्वागत केले जाणार आहे. डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, ही सुरुवात मुलांमध्ये आत्मभान जागवणारी, सुसंवाद वाढवणारी आणि शिक्षणातील आपुलकी वाढवणारी असेल.

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित
राज्यातील आश्रमशाळांमध्ये आता प्रत्येक ठिकाणी एक नर्स नियुक्त करण्यात येणार आहे. सहा वर्षांवरील बालकांच्या दृष्टीने हा निर्णय क्रांतिकारक आहे. आता शाळेतच प्राथमिक आरोग्यसेवा, नियमित तपासणी आणि प्राथमिक उपचार सहज उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुस्थितीत राहण्यासाठी हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची बांधिलकी जपत, अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी आता ‘पवित्र पोर्टल’चा वापर होणार आहे. या प्रणालीद्वारे TET उत्तीर्ण, पात्र आणि गुणवत्ता असलेले शिक्षक निवडले जातील. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरेल, जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम मार्गदर्शन मिळेल.
सन्मानाचा टप्पा
राज्यभरातील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये प्राविण्य मिळवलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील टॉप तीन मुले व तीन मुलींना आणि राज्यस्तरावरील टॉप पाच मुले व मुलींना गौरवण्यात येईल. हा सन्मान विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवण्याची प्रेरणा देईल आणि शैक्षणिक उत्कर्षाला नवे बळ मिळेल. वसतीगृहातील शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सुविधा संबंधित समस्या सोडवण्यासाठी आता ‘वसतीगृह समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रकल्प कार्यालय स्तरावर काम करत विद्यार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करेल. व्यवस्थापनातील सुसंवाद आणि सेवा दर्जा सुधारण्यासाठी हा टप्पा प्रभावी ठरणार आहे.
प्रशासन थेट मुलांच्या मनात
शासन यंत्रणा विद्यार्थ्यांच्या अधिक जवळ जाण्यासाठी ‘संवाद चिमुकल्यांशी’ या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. राज्यातील प्रत्येक दुर्गम आश्रमशाळेला वरिष्ठ अधिकारी भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतात. या माध्यमातून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाय केले जात आहेत. या संवादाने विद्यार्थी शासनाशी आत्मीयतेने जोडले गेले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने, डॉ. अशोक वुईके यांच्या निर्णयक्षम नेतृत्वात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात एक नवा अध्याय सुरू होत आहे. केवळ प्रवेशाचा नव्हे, तर शिक्षणातील संधी, गुणवत्ता आणि आत्मभानाचा हा उत्सव आहे, जो राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळवण्यासाठी सज्ज आहे.