
अमरावती जिल्हा परिषदेत प्रशासनाच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. ‘आस्थापना दिना’च्या रूपाने एक संवादशील, निर्णयक्षम उपक्रम सुरु करण्यात आला आहे. प्रलंबित प्रश्नांची उकल आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.
अमरावती जिल्हा परिषदेच्या कारभारात गेल्या काही महिन्यांपासून सकारात्मक बदलांची नवी दिशा दिसून येते आहे. प्रशासनात कामकाजाची गती वाढवणे, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, आणि जनतेच्या समस्या वेळेत सोडवणे या दिशेने एकामागोमाग एक ठोस पावले उचलली जात आहेत. आता या यादीत आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाची भर पडली आहे ती म्हणजे ‘आस्थापना दिन’. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेला हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी राबवण्यात येणार आहे. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुख व अधिकारी एकत्र बसून चर्चा करतील.
संजीता महापात्र यांनी अमरावती येथे सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यापासूनच प्रशासकीय कार्यपद्धतीत अनेक नावीन्यपूर्ण बदल घडवून आणले आहेत. परंपरेप्रमाणे हार-तुर्यांच्या स्वागताला थांबवून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य गोळा करण्याचे आवाहन केले. गोळा झालेले साहित्य मेळघाट व इतर दुर्गम भागातील शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले. हा उपक्रम समाजाभिमुख विचारसरणीचा उत्तम नमुना ठरला.

महिलांसाठी स्वतंत्र संवाद गट
त्यांच्या नेतृत्वात पुढे संवाद सत्र या नावाने एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्यात आला. कर्मचाऱ्यांमधील संवाद वाढवणे, एकमेकांच्या समस्या समजून घेणे आणि कार्यालयीन कामात समन्वय निर्माण करणे या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र संवाद गट तयार करण्यात आले. महिलांना कार्यालयीनच नव्हे, तर कौटुंबिक अडचणी देखील मांडण्याची मोकळीक देण्यात आली आणि त्यावर सीईओंच्या पातळीवर मार्गदर्शन करण्यात आले.
तातडीने निर्णय घेण्याचे काम
याच सकारात्मक बदलांच्या प्रवाहात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले ते म्हणजे “तक्रार निवारण दिन”. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तक्रारी ऐकून घेण्यात येतात आणि त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे काम केले जाते. हे उपक्रम प्रशासनाला जनतेच्या अधिक जवळ नेणारे ठरले आहेत.
मेळघाटसारख्या दुर्गम भागातही विकासाचे कवडसे पोहोचावेत यासाठी “एक दिवस मेळघाटसाठी” ही अभिनव संकल्पना राबवण्यात आली. या दिवशी वरिष्ठ अधिकारी मेळघाटमध्ये जाऊन तेथील जनतेच्या अडचणी समजून घेतात, त्यावर जागेवरच तोडगा काढतात. या उपक्रमामुळे शासनाच्या धोरणांचा लाभ आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची आशा निर्माण झाली आहे.
यशाचा टक्का वाढेल
अमरावतीच्या तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी महापात्र यांनी वेगळी योजना राबवली. जिल्ह्यात नवीन रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना परीक्षार्थींशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. यामुळे परीक्षार्थ्यांना थेट मार्गदर्शन मिळू लागले आहे. अमरावतीचा स्पर्धा परीक्षांतील यशाचा टक्का वाढेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
या साऱ्या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता ‘आस्थापना दिन’च्या निमित्ताने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी प्रलंबित प्रश्नांच्या निस्तारणासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. हा दिवस म्हणजे केवळ चर्चा नव्हे, तर निर्णय घेण्याची आणि अंमलबजावणीची दिशा ठरवण्याचा दिवस असेल.
संजीता महापात्र यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा परिषद एक सकारात्मक आणि कार्यक्षम प्रशासनाची नवी ओळख निर्माण करीत आहे. प्रशासनात नवचैतन्याची लहर निर्माण करणारा ‘आस्थापना दिन’ हा उपक्रम भविष्यात इतर जिल्ह्यांसाठीही एक आदर्श ठरू शकतो.