
राज्यातील आरटीओ ऑफिसवर सध्या कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे आता महापालिकास्तरावर स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
राज्यात जवळपास 57 प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि 8 उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे या सर्व कार्यालयांच्या कामकाजावर ताण पडत आहे. सर्वाधिक कामाचा ताण शहरी भागातील आरटीओ कार्यालयांवर आहे. त्यामुळे वाहन संदर्भातील कामे करताना शहरी भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच राज्यभरातील महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
आरटीओ कार्यालयामध्ये लर्निंग लायसन, परमनंट लायसन, वाहनांचा टॅक्स, वाहनांना लागणारी एनओसी आदी कामे केली जातात. सध्याच्या रचनेमध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आरटीओ कार्यालय देण्यात आले. आहे. अनेक ठिकाणी एआरटीओ कार्यालय कार्यरत आहेत. मोठ्या शहरांमध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग करून आरटीओचे काम केले जात आहे. सध्या या विभागावर कामाचा प्रचंड ताण आहे. मनुष्यबळ देखील मोजकेच आहे. सर्वाधिक कामेही शहरी भागातील नागरिकांची आहे.

Load Sharing करणार
महापालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना आरटीओ कार्यालयातील कामे करण्यासाठी बरेच अंतर गाठावे लागते. बरेचदा आरटीओचे अधिकारी तपासणीसाठी गेलेले असतात. त्यामुळे नागरिकांची कामे अडकून पडतात. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या हद्दीमध्ये स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. विदर्भातील नागपूर येथे शहर आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कार्यालय आहे. चंद्रपूर, अमरावती आणि अकोला येथे महापालिका आहे. मात्र येथे महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र कार्यालय नाही.
या तीनही जिल्ह्यातील नागरिकांना आरटीओ शी संबंधित कामांसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी यावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. अलीकडेच सरकारने काही आरटीओ कार्यालयांची संख्या वाढवली. परंतु त्या तुलनेमध्ये मनुष्यबळ वाढलेले नाही. कार्यालयांची संख्या वाढवताना मनुष्यबळ देखील वाढविणे गरजेचे झाले आहे. उत्सवाच्या काळामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी होते. त्यामुळे वाहनांची नोंदणी करण्यासाठी नागरिकांना ‘वेटिंग लिस्ट’वर राहावे लागते.
महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय झाल्यास त्याचा फायदा छोट्या महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्या शहरांना होणार आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारून संगणकीय प्रणालीवर परवाने देण्यात येतील, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी दिली.भाईंदरच्या उत्तन येथे परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या. मीरा भाईंदर येथे महापालिका आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेली अडीच एकर (9 हजार 700 चौरसमीटर ) इतकी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचा ताबा त्वरित प्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौड यांना दिले आहेत.