
राजकारणात बहुतेक वेळा आश्वासनं केवळ कागदावरच राहतात, पण नितीन गडकरी यांच्या कामकाजाची शैली याला अपवाद ठरते. देवळी मतदारसंघातील विकासकामांना त्यांच्या तत्परतेमुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
राजकारणात अनेक वेळा आश्वासनं दिली जातात, पण ती प्रत्यक्षात उतरतीलच याची खात्री कुणी देत नाही. विकास कामांना गती देणे म्हटले की, अनेक मंत्री टाळाटाळ करतात. प्रगतीचा मार्ग रखडला जातो. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत वेगळा अनुभव प्रत्येक वेळी दिसतो. ‘गडकरी बोलले की काम झाले’ हे विधान केवळ वाक्य उरत नाही, तर वास्तवात उतरते. याची प्रचिती पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्यातील देवळी मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे.
भाजप आमदार राजेश बकाने हे माजी खासदार रामदास तडस यांच्यासोबत थेट नागपूरला गडकरी यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी देवळी-दिघी ते बोपापूर रस्ता, सालोड पडेगाव ते चिकणी रस्ता आणि दहेगाव पुलगाव ते अमरावती जिल्हा सीमेला जोडणारा महत्त्वपूर्ण पूल या तीन प्रमुख प्रकल्पांची मागणी पत्राद्वारे मांडणी केली. बैठकीत गडकरी यांनी थेट विचारले, यात सर्वात महत्त्वाचे काम कोणते? आमदार बकाने यांनी पूल अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर गडकरींनी एका क्षणाचाही विलंब न करता सकारात्मक प्रतिसाद दिला. गडकरी म्हणाले, जा, मतदारसंघात जाहीर कर. विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण झाले, असे ठामपणे सांगत त्यांनी मंजुरी दिली.

विकास कामांना गती
उत्साहवर्धक निर्णयानंतर, आमदार बकाने यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. देवळी शहरात प्रवेश करताना वापरला जाणारा मार्ग अतिशय अरुंद असून, तो अपघातप्रवण आहे. भविष्यात ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा धोका संभवतो. ही समस्या मांडताच गडकरींनी तत्काळ उपाय सुचवला. गडकरी म्हणाले, आकस्मिक काम असेल तर त्याची तरतूद केंद्रीय परिवहन खात्याकडे असते या कामासाठी ‘वन टाइम इम्प्रूव्हमेंट’ अंतर्गत तरतूद करता येते, असे सांगत त्यांनी त्या रस्त्याच्या सुधारणेस मंजुरी दिली. एकाच भेटीत 75 कोटी रुपयांच्या कामांपैकी 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळवून आमदार बकाने यांनी विकासाच्या कामांना गती दिली. त्याचबरोबर धोकादायक ब्लॅक स्पॉटसुद्धा दूर होणार, ही मोठी दिलासादायक बाब ठरली.
भेटीतून हे स्पष्ट झाले की नुसत्या घोषणा न करता, गडकरी विकासाच्या कामांना प्रत्यक्ष गती देतात. देवळी मतदारसंघातील जनतेसाठी ही भेट विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरली आहे. गडकरींच्या या तत्परतेमुळे जिल्ह्याला केवळ रस्त्यांचे जाळेच नव्हे तर सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीची नवी दिशा मिळणार आहे.