महाराष्ट्र

Nitin Gadkari : विदर्भाच्या संधींना नवे पंख

Nagpur : थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी गडकरींचे प्रयत्न

Author

नितीन गडकरी यांनी नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूरसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. यामुळे नागपूरच्या आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला मोठी चालना मिळणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला चालना देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांना पत्र लिहून नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूरसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. औद्योगिक विकास संघ (AID), नागपूरच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती, ज्यानंतर गडकरी यांनी यास दुजोरा दिला.

धावपट्टीच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ 24×7 कार्यरत आहे. याचा फायदा घेत नागपूरमधून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नागपूरच्या औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राच्या वाढीला या सेवांमुळे मोठी चालना मिळू शकते. यामुळे आयटी कंपन्या, उत्पादन क्षेत्र आणि व्यापार करणाऱ्या उद्योजकांना मोठा फायदा होईल. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी विदर्भ हा अधिक आकर्षक गुंतवणुकीचा केंद्रबिंदू ठरेल.

Amravati : अचलपूरात वाळू माफियांवर पोलिसांचा धडक छापा

नागपूरचे आर्थिक केंद्र

नागपूर हा देशातील वेगाने वाढणारा व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येत आहे. टीसीएस, पर्सिस्टंट सिस्टम्स, ग्लोबल लॉजिक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, ॲक्सेंचर आणि इन्फोसिससारख्या प्रमुख IT कंपन्यांची येथे उपस्थिती आहे.

नागपूरहून थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असल्यास या कंपन्यांना जागतिक पातळीवर अधिक संधी उपलब्ध होतील. याशिवाय, नागपूरमध्ये नुकतेच 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून परनोड रिकार्ड, अवाडा ग्रुप आणि कोरियन ग्रुपसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे आपले ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळे नागपूरच्या विकासाला अधिक वेग येणार आहे.

Atul Londhe : सरकारला जेपीसीमध्ये कलम दर कलम चर्चा नको

मंत्रालयाकडून निर्णयाची अपेक्षा

नितीन गडकरी यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाला एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर आणि इतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपन्यांशी संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनाही पत्र लिहून या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे.

मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसाठी स्थानिक हवाई सेवा सुधारणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नागपूर आणि संपूर्ण विदर्भाचा विकास वेगाने होईल आणि हा भाग देशाच्या प्रमुख आर्थिक केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येईल. नितीन गडकरींच्या या धोरणात्मक निर्णयामुळे नागपूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि वाहतूक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!