
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या ११ वर्षांत नागपूरसह देशभरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेची 11 वर्षं पूर्ण केली आहे. या निमित्ताने भाजपकडून देशभरात एक व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कामगिरीचा सविस्तर आढावा जनतेसमोर ठेवला. गडकरी म्हणाले, काँग्रेसने 60 वर्षांत जे करू शकलं नाही, ते आम्ही अवघ्या 11 वर्षांत करून दाखवलं आहे. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण देशात पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक बदल घडवले गेले आहे.
गडकरी यांनी स्पष्ट केलं की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वॉटर, पावर, ट्रान्सपोर्ट आणि कनेक्टिव्हिटी या चार प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या क्षेत्रांमध्ये झालेल्या कामामुळे देशाची सूरत बदलली असून, ग्रामीण भागातील नागरिकांपासून ते शहरी उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांना याचा फायदा झाला आहे. उद्योगवाढीसाठी सरकारने केलेले प्रयत्नही त्यांनी स्पष्ट केले. सध्या आपली लॉजिस्टिक कॉस्ट ही चीनच्या तुलनेत जास्त आहे. जी स्पर्धेमध्ये अडथळा ठरते. मात्र डिसेंबर 2025 पर्यंत ती सिंगल डिजिटमध्ये आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं. यासाठी औद्योगिक कॉरिडॉर, एक्सप्रेस-वे आणि रस्त्यांच्या कडेला ऑप्टिकल फायबर टाकण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

Akola : दादांनी वाळलेली झाडं पाहिली अन् अख्ख्या यंत्रणेला पाणी पाजलं
उपराजधानीचा विकास
गडकरी यांनी सांगितले की, देशातील रस्त्यांचे जाळे इतकं सक्षम झालं आहे की आता लोक बंगळुरू किंवा चेन्नईहून महाकुंभसाठी प्रयागराजपर्यंत स्वतःच्या वाहनाने पोहोचू शकतात. बौद्ध सर्किट, चारधाम मार्ग, रामगमन मार्ग यांसारख्या धार्मिक मार्गांमुळे यात्रेचा अनुभव अधिक सुलभ झाला आहे. या रस्त्यांमुळे केवळ धार्मिक प्रवास नव्हे, तर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. गडकरी म्हणाले, या सर्व प्रकल्पांमुळे देशाच्या सांस्कृतिक वारशालाही नवसंजीवनी मिळाली आहे. गडकरी यांनी आपला खास नागपूर लोकसभा मतदारसंघही विसरले नाही.
गडकरी यांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत नागपूर शहर आणि ग्रामीण भागात एकत्रितपणे 20 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले आहे. यामध्ये फ्लायओव्हर, अंडरब्रिज, नागपूर मेट्रो, एम्स हॉस्पिटल आणि फुटाळा येथील म्युझिकल फाउंटन यांसारखी कामं समाविष्ट आहे. नागपूरचं रूपांतर हे केवळ शहराच्या सौंदर्यात नव्हे, तर येथील नागरिकांच्या जीवनमानातही आमूलाग्र बदल घडवून आणणारे आहे, असा आत्मविश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.