
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केवळ यशस्वी राजकारणी नाहीत, तर ते एक दूरदृष्टीचे विचारवंतही आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रभावी भाषणशैलीमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.
देशात विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे केवळ एक राजकारणी नाहीत तर ते एक विचारवंतही आहेत. त्यांचे प्रत्येक वक्तव्य ठाम आणि प्रभावी असते. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. त्यांच्या भाषणांमध्ये एक वेगळी जादू असते, जी लोकांना अंतर्मुख करायला भाग पाडते.
सध्या नितीन गडकरींच्या फेसबुकवरील एक रिल्स प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांनी आपल्या जीवनाचा एक हृदयस्पर्शी अनुभव सांगितला आहे. जो लाखो लोकांच्या मनाला भिडला आहे. आपल्या यशस्वी आणि भव्यदिव्य जीवनाच्या प्रवासात जरी त्यांनी सर्व सुख-सुविधा मिळवल्या असल्या, तरीही त्यांचं एक महत्त्वाचं निरीक्षण आहे. “संपत्ती आली, सत्ता मिळाली, पण पूर्वीचा आनंद मात्र हरवला.

हरवलेला आनंद
नितीन गडकरी म्हणाले, गरिबी होती, राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं, मुलांच्या शाळेच्या फी भरण्यासाठी पैसे नव्हते, पण तरीही घरात आनंद होता. आज बंगला आहे, महागड्या गाड्या आहेत, हेलिकॉप्टर आहे, विमान आहे, पण तो आनंद मात्र कमी झाला आहे.
गडकरी यांनी सांगितलं की जीवनात सत्ता, संपत्ती, ज्ञान आणि सौंदर्य या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्या तरीही या चारही गोष्टी नश्वर आहेत. “जे काल होतं, ते आज नाही, आणि जे आज आहे ते उद्या नसेल. काळाच्या ओघात या गोष्टी नष्ट होतात. त्यामुळे त्यामागे आंधळेपणाने धावण्यापेक्षा, जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. गडकरींचं हे वक्तव्य राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख करणारं आहे.
संत्री आता फूड पार्कमध्ये
या व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, नागपुरात नुकत्याच झालेल्या एका भव्य कार्यक्रमात गडकरींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. उपराजधानीतील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब परिसरात असलेल्या पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.
तब्बल एक हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे दहा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 2016 मध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं आणि तब्बल आठ वर्षांनी या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी गडकरींनी त्यांच्या खासगी जीवनातील एक गमतीशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या शेतात मोठ्या प्रमाणात संत्र्यांचं उत्पादन होतं. आता ही संत्री मी रामदेवबाबांच्या पतंजली फूड पार्कमध्ये देणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल.
गडकरींचा दृष्टीकोन
नितीन गडकरी यांची गणना देशातील यशस्वी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी पायाभूत सुविधांपासून ते कृषी क्षेत्रापर्यंत मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. मात्र, इतक्या मोठ्या यशानंतरही त्यांना आनंद आणि समाधान यामधला फरक जाणवतोय.
संपत्ती, सत्ता, प्रसिद्धी मिळवूनही जर आपण आनंद हरवत असू, तर त्या यशाला काय अर्थ? असा विचार त्यांच्या वक्तव्याने निर्माण होतो. गडकरींचं हे मनोगत आपल्या रोजच्या जीवनावर विचार करायला लावणारं आहे. आपणही आपल्या धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी हा आनंद हरवत चाललो आहोत का? हे एकदा स्वतःलाच विचारायची वेळ आता आली आहे.