
महायुती सरकार सत्तेवर येऊन बरेच दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली तारीखही निघुन गेली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत सत्ता स्थापनेबाबत रस्सीखेच सुरू होती. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनह शपथ घेतली. त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अखेर हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आता जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरील नियुक्ती रखडली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत तारीख दिली होती. मात्र ही तारीखही आता निघुन गेली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशात सर्वत्र ध्वजारोहणाचा समारोह आयोजित करण्यात येतो. या समारोहात जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येतं. मात्र अद्यापही पालकमंत्री निश्चित न झाल्यानं नेमकं काय होणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र आता पालकमंत्री पदाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा नवीन विधान केलं आहे. येत्या 26 जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्याचे नाव जाहीर झालेले असेल, असा विश्वास महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

तिढा कायम
बावनकुळे यांनी 16 जानेवारीपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल, असा दावा केला होता. मात्र आता त्यालाही अनेक तास उलटले आहेत. पालकमंत्री पदाबाबत नेमकी कोणाकडून अडवणूक केली जात आहे, हे अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर संपूर्ण हिवाळी अधिवेशनात मंत्री विनाखात्याचे होते. अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मात्र त्यानंतर अद्यापही पालकमंत्री पदाबाबत महायुतीत एकमत झालेलं दिसत नाही. पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांच्याकडे दिली होती. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा केली. मात्र अद्यापही तोडगा निघाल्याचं दिसत नाही.
सुमारे तीन आठवडे झाले तरी अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. आता बावनकुळे म्हणाले की, फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी हा विषय सुटलेला असेल. पालकमंत्री नियुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ते त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतील. मात्र यासंदर्भात अद्यापही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. त्यामुळं पालकमंत्री नियुक्त करण्यासाठी इतका विलंब का लागत आहे, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. आता महसूल मंत्र्यांनी दिलेली नवीन मुहूर्त काम साधला जाईल का, याची उत्सुकता आहे.