
महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी कायदा कुचकामी ठरत आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करत शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला दिनी एक धक्कादायक मागणी केली.
दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नाही. महिलांनी आपल्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारा दिवस आहे. समानता, सुरक्षितता आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क हे केवळ घोषणाबाजीपुरते मर्यादित राहू नयेत, तर ते प्रत्यक्षात उतरले पाहिजेत. आज विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत महिला मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. मात्र, महिला सुरक्षेचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, आज महिलांना संरक्षणाची गरज आहे की स्वसंरक्षणाची? हाच प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि ही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या एका खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली. यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला, तर शुक्रवारी आणखी एका तरुणीची छेडछाड झाल्याचे उघड झाले. या घटनांनी समाजाला हादरून सोडले आहे. सरकार आणि प्रशासन यांना या गुन्ह्यांना आळा घालण्यात अपयश येत असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक धक्कादायक मागणी केली आहे. त्यांनी म्हणाल्याप्रमाणे, ‘आम्हा महिलांना एक खून माफ करा,’ ही विनंती त्यांनी थेट राष्ट्रपती महोदयांकडे केली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

असुरक्षिततेची दाहकता
आपला देश शांती आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या विचारांवर उभा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत महिला स्वतःला अत्यंत असुरक्षित समजत आहेत. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत बारा वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार झाला. भारत हा महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित देश असल्याचे आंतरराष्ट्रीय अहवालांमध्येही नोंदवले गेले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर महिलांची अस्वस्थता आणि रोहिणी खडसेंच्या मागणीचे गांभीर्य लक्षात येते.
मोठ्याप्रमाणात यंदाही जागतिक महिला दिन साजरा करत असताना आपण महिला सशक्तीकरणाविषयी मोठमोठ्या घोषणा करतो. मात्र, दुसरीकडे, महिलांचे अस्तित्वच संकटात असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ राजकीय घराण्यातील मुलींच्याच नव्हे, तर सामान्य घरातील महिलांवरही वारंवार अत्याचार होत आहेत. त्यांच्यासाठी घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे.
Pratibha Dhanorkar : संघर्षाची साखळी तोडत नेतृत्त्वाच्या शिखरावर