
‘लाडकी बहिण योजना’बाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार व भ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, योजनेत कोणताही बदल न करता महिलांना संपूर्ण लाभ मिळत राहील, असं राज्यमंत्री डॉ. आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील गाजत असलेल्या ‘लाडकी बहिण योजना’बाबत सध्या एक मोठा संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. काही विरोधकांचं म्हणणं आहे की महिलांना आता फक्त 500 रुपयेच मिळतील. हे ऐकून अनेक महिलांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. मात्र, या सगळ्यावर अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी थेट खुलं स्पष्टीकरण देत विरोधकांच्या प्रचाराला खोडून काढलं आहे.
लाडकी बहिण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली. सुरुवातीला कार्यालयात अफाट गर्दी झाली असती, म्हणून शासन निर्णयात सुधारणा करून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली. यामुळे कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. विरोधक मात्र खोटा भ्रम पसरवत आहेत की, आता महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार, असं स्पष्ट करत जयस्वाल यांनी विरोधकांच्या प्रचाराचा पर्दाफाश केला.

योजना पात्र महिलांसाठी
आजपर्यंत कोणत्याही महिलेला गुन्हेगारी स्वरूपात वसुलीचा नोटीस पाठवलेली नाही. कोणावर गुन्हा दाखल नाही. शासन निर्णयात कोणताही बदल झालेला नाही. पात्र महिलांना योजना सुरू राहील आणि निधी मिळतच राहील, असं जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. त्यांनी यासोबतच स्पष्ट केलं की, काही श्रीमंत महिलांनी चुकीने योजना घेतली असेल, तर नियमबाह्य लाभार्थींवर योग्य ती कार्यवाही केली जाईल. पण याचा अर्थ असा नाही की, संपूर्ण योजना बंद होते किंवा सर्व महिलांना आता कमी रक्कम मिळेल.
सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना, नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनेत वाढीव लाभ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यावर बोलताना जयस्वाल म्हणाले की, सरकारचं उत्पन्न दरवर्षी वाढतंय. जसं उत्पन्न वाढेल, तशी योजनेतील तरतूदही वाढवली जाईल. महिलांना दोन हजार 100 रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे आणि ते पूर्ण केलं जाईल. कोणत्याही वचनाची फसवणूक होणार नाही.
योजनेवर बोलताना आशिष जयस्वाल यांनी सरकारच्या कामगिरीवर भर देत सांगितलं की, “इतिहासात योजनेची नोंद होईल. आम्ही उत्पन्नाच्या मर्यादा न मोडता योजना राबवल्या आहेत. महिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला निवडून दिलं. तो विश्वास तसाच ठेवलं जाईल. विरोधकांकडून योजनेच्या नावाने 500 रुपयेच मिळणार’ असा जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही जयस्वाल यांनी ठामपणे नमूद केलं. त्यांनी सांगितलं की, शासन निर्णयामध्ये जर काही बदल झाला, तर तो अधिकृत वेबसाईटवर लगेच अपडेट होईल. तेव्हा प्रश्न उपस्थित करणं योग्य ठरेल, असे जयस्वाल म्हणाले.