
सभागृहात संख्या जास्त असेल त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होईल. आपल्याला ठाम विश्वास आहे काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता होईल, असं आमदार नाना पटोले यांनी नमूद केलं.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सरकारला कोंडीत पकडण्याऐवजी महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधातच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून जोरदार स्पर्धा सुरू आहे. उद्धव ठाकरे आपल्या अटींवर ठाम आहेत. शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद हवं आहे. यावर आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटानं सरकारला घेरण्याचे नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात महाविकास आघाडीतच अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विरोधी पक्षनेतेपद कोणाच्या हाती जावे, यावरून गटबाजी झाली आहे. कोणत्याही पक्षातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय आमदारांवर सोडला आहे. तरी ते स्वतःच पुत्र आमदार आदित्य ठाकरेंसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेते आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोध करत आहेत. अनुभवी नेत्याला संधी दिली पाहिजे, असा अनेकांचा आग्रह आहे. मात्र, उद्धव ठाकरे आदित्य यांच्या नावावरच ठाम असल्याने स्पर्धा वाढत आहे.

Maharashtra Budget Session : नेते बनले धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंची ढाल
नाना स्टाइल उत्तर
काँग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. विरोधी पक्षनेता काँग्रेसचाच होईल, असा ठाम दावा नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेसकडे अधिक आमदार आहेत. शिवसेनेकडे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या 12 आहे. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. इतर पक्षांचे 12 आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळं विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते व्हावे, एवढं संख्याबळ काँग्रेसजवळ आहे. मात्र मध्येच शिवसेनेने आपल्या नेत्यांची नावं पुढं केली आहे. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव ही नावं चर्चेत आहे. मात्र पटोले यांनी ही शक्यता फेटाळली आहे.
काँग्रेसच्यावतीने विजय वडेट्टीवार यांच्या नावाला सर्वाधिक पाठिंबा आहे. शिवसेना ठाकरे गट अडमुठेपणा दाखवत राहिला, तर आघाडीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार नाना पटोले यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. विरोधी पक्षनेतेपद त्याच पक्षाला मिळेल, ज्याची संख्याबळ जास्त आहे. त्यातून त्यांनी काँग्रेसला संधी मिळेल असे ठाम संकेत दिले आहेत. संख्या बळाचा मुद्दा बाजूला ठेवायचा असेल तर किमान अनुभवी नेत्याला संधी द्यावी, असं काँग्रेसचं मत आहे.
सरकारला फायदा
विरोधी पक्षातील हा संघर्ष आता महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सरकारला धारेवर धरण्याऐवजी विरोधक आपल्यातच लंगडी खेळत आहेत. हे चित्र महायुती सरकारला फायदा देणारे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेत्याचा वाद अधिक चिघळला तर काँग्रेस काय करणार, याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. काँग्रेसकडं संख्याबळ असल्याने ते हक्क सोडणार नाही, असं सांगण्यात येत आहे. आता कोण विरोधी पक्षनेता होतो, हे पाहण्यासारखं ठरणार आहे.