
पद्म पुरस्कार 2025 वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान दिग्गजांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांचे वितरण 28 एप्रिल सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांना गौरवित करतील. पद्म पुरस्कारांचे वितरण यंदा दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 139 विजेत्यांपैकी 71 जणांना सन्मानित केले जाईल. यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित 68 पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात होणार आहे.
यंदा एकूण 139 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. यापैकी 13 जणांना मरणोत्तर सन्मान दिला जाणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध भोजपुरी गायिका शारदा सिन्हा, सुजुकी कंपनीचे ओसामु सुजुकी आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये डॉ. विलास डांगरे, साहित्यिक आणि निसर्गप्रेमी मारुती चितामपल्ली, अभिनेते अशोक सराफ कृषी चिंतक सुभाष शर्मा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा 23 महिलांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 10 परदेशी नागरिक, तसेच एनआरआय, पीआयओ आणि ओसीआय श्रेणीतील व्यक्तींनाही सन्मानित केले जाणार आहे.

दिग्गजांचा समावेश
पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये डॉ. विलास डांगरे हे नागपूरचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ आहेत. मागील अनेक वर्षांपासून डॉ. डांगरे यांनी वैद्यकीय सेवा दिल्या आहेत. आतापर्यंत जवळपास एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर डॉ. विलास डांगरे यांनी उपचार केले आहेत. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांवर ते उपचार करतात. त्याचबरोबर मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. मारुती चितमपल्ली हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. चितमपल्ली हे वन्यजीव प्रेमी आहेत. ते वन आणि वन्यजीवाच्या संवर्धनासाठी काम करतात. मराठी चित्रपटातील अभिनेते अशोक सराफ यांचा देखील या यादीत सामावेश आहे. मागच्या वर्षी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे भारत सरकारच्या तिन्ही पद्म पुरस्कारांवर यवतमाळकरांनी मोहोर उमटवली आहे. यापूर्वी ज्येष्ठ राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बापूजी अणे उर्फ माधव श्रीहरी अणे यांना भारत सरकारने ‘पद्म विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच वामन (दादा) बापूजी मेत्रे कळंब येथील ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ आहेत. यांनाही भारत सरकारकडून ‘पद्म भूषण’ प्राप्त झाले आहे. सुभाष शर्मा यांच्या रूपाने यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच पद्मश्री हा सन्मान प्राप्त झाला आहे.
नैसर्गिक शेती
सुभाष शर्मा मागील तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करत आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत. शर्मा यांच्या प्रेरणेने देशभरातील हजारो शेतकरी विषमुक्त नैसर्गिक शेती करीत आहेत. यवतमाळ जवळच्या तिवसा येथील त्यांची 20 एकर शेती एक प्रकारे नैसर्गिक शेतीची प्रयोगशाळाच म्हणता येईल. या शेतीमध्ये त्यांनी रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर केलेला नाही. केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात भेटी देऊन प्रशिक्षण घेतले आहे.
पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोहर जोशी , पंकज उधास आणि शेखर कपूर या तीन दिग्गजांना पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाले आहे. तर राज्यातील 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाले आहे. यामध्ये सुभाष शर्मा – कृषी, डॉ. विलास डांगरे- औषधी, अशोक सराफ – कला, अच्युत पालव – कला, अरुंधती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग, अश्विनी भिडे देशपांडे – कला, चैतराम देवचंद पवार – समाजसेवा, जसपिंदर नरुला – समाजसेवा, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली – साहित्य आणि शिक्षण, राजेंद्र मुजुमदार – कला आणि वासुदेव कामत – कला यांचा समावेश आहे.