
जातनिहाय जनगणना मंजूर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. यावर आता भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना हा पक्षाच्या वर्षानुवर्षांच्या सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा परिणाम आहे.
देशात सामाजिक न्यायाची नवी दिशा ठरवणारा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासाची ग्वाही दिली आहे. या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करताना भाजप नेते, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या निर्णयाला सामाजिक उत्कर्षाचे पर्व असे संबोधले आहे. डॉ. परिणय फुके म्हणाले, मोदी सरकारने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सर्व जाती-धर्मांना समवेत घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे मोठं पाऊल आहे.
डॉ. फुके यांनी पुढे सांगितले की, ही जनगणना केवळ आकड्यांची नोंद नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने एक निर्णायक वळण आहे. डॉ. फुके यांनी आठवण करून दिली की, 2007-2008 पासून अनेक संघटनांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. 2011 मध्ये काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सर्वे झाला होता, मात्र त्या सर्वेची माहिती जनतेसमोर आली नाही. आकडेवारी गोळा झाली पण ती लपवली गेली, असा आरोपही त्यांनी केला. मोदी सरकारच्या निर्णयामुळे, ओबीसी समाजासह सर्वच घटकांना आपली लोकसंख्या आणि हक्क अधिक स्पष्टपणे मांडता येतील.

सरकारमध्ये लाडके भाऊ
मोदीजींनी हे पाऊल उचलून देशातील अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली आहे. सर्व समाज यासाठी त्यांच्या ऋणी आहेत, असंही डॉ. फुके म्हणाले. त्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवत म्हटले की, 2004 ते 2014 या काळात राहुल गांधी खासदार होते. मनमोहन सिंग त्यांच्याच रिमोट कंट्रोलवर चालत होते. तेव्हा त्यांनी का नाही हा निर्णय घेतला? असा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात अडीच वर्ष त्यांची सत्ता होती. तरी त्यांनी का नाही ही जनगणना केली? अशी विचारणा करत त्यांनी विरोधकांची भूमिका संशयास्पद असल्याचं सूचित केलं.
लाडकी बहीण योजनेवरूनही अनेक प्रतिसाद उमटत आहेत. यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना डॉ. फुके म्हणाले, ज्यावेळी योजना सुरू झाली तेव्हाही विरोधक म्हणत होते की सरकारकडे पैसे नाहीत, पण आज प्रत्येक बहिणीच्या खात्यात निधी जमा होत आहे. ही योजना फक्त घोषणांसाठी नव्हे, तर प्रत्यक्षात अंमलात आलेली आहे. आता सरकारमध्ये सगळेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. तेच योजनेच्या यशासाठी पुढाकार घेत आहेत, असं सांगत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त
मुख्यमंत्रिपदातही होते अनुपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने शनिवार 2 मे रोजी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सोहळ्याला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मुद्द्यावर बोलताना डॉ. फुके म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अनेकदा अनुपस्थित राहायचे. आता पुन्हा ते अपसेंट राहणार आहेत. नेपाळ दौऱ्यावर असताना डॉ. परिणय फुके यांनी तिथल्या मंत्र्यांची भेट घेतली. नेपाळमधील अनेक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामावर भारावून गेले आहेत. त्यांनी जसं भारतात रस्त्यांचं जाळं उभं केलं, तसंच जाळं नेपाळमध्ये व्हावं यासाठी गडकरणी सारखा नेता आम्हाला मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे, अशी माहिती डॉ. परिणय फुके यांनी दिली.