महाराष्ट्र

Parinay Fuke : थोडा धीर धरा, तीन हजाराचा शब्द होणार खरा

Ladki Bhaini Yojana : राज्याच्या महिला लाभार्थींच्या आशा पुन्हा पल्लवित

Share:

Author

भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी महिलांना 2 हजार 100 ऐवजी थेट 3 हजार रुपये मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची चर्चा रंगली आहे. हे अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आले आहे. अवघ्या दोन दिवसांत त्याची समाप्ती होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विविध नव्या योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र, सर्वसामान्य महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. महिलांना दरमहा 2 हजार 100 रुपये मिळणार की नाही, याची उत्सुकता वाढत चालली आहे. महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान या योजनेतील सहाय्य वाढवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही लाभार्थींना केवळ 1 हजार 500 रुपये मिळत आहेत.

अर्थमंत्री अजित पवार यांनी वाढीव रकमेसाठी प्रतीक्षा करण्यास सांगितल्यानंतर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी महिलांना केवळ 2 हजार 100 रुपये नाही, तर थेट तीन हजार रुपये मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परिणय फुके यांनी सांगितले की, राज्याची आर्थिक स्थिती सुधारत गेल्यास योजनेतील रकमेत हळूहळू वाढ केली जाईल. सध्या 1 हजार 500 रुपये सुरूच राहतील, पण भविष्यात हा निधी 2 हजार 100 आणि त्यानंतर 3 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.

Chandrashekhar Bawankule : वारसांना कोर्टाची पायरी चढायची गरज नाही

आर्थिक स्थिती मंदावली

सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना दरमहा 1 हजार 500 रुपये देण्याची तरतूद केली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात नऊ हप्ते जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी महिलांना 1 हजार 500 ऐवजी 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून महायुती सत्तेत आली असली, तरी प्रत्यक्षात 2 हजार 100 रुपये कधीपासून मिळणार, याबाबत कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच हा वाढीव निधी दिला जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे महिलांच्या आशा अजूनही धूसर राहिल्या आहेत.

वाट कधीपर्यंत

फुके यांच्या या विश्वासामुळे महिलांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी किती कालावधी लागेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारने या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, त्याचा लाभ प्रत्यक्षात केव्हा मिळणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. परिणय फुके यांनी व्यक्त केलेल्या विश्वासामुळे सरकारने महिला कल्याणासाठी आणखी कोणते निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी सरकारकडून आणखी योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या महिलांना 3 हजार रुपये मिळण्याचा विश्वासव्यक्त केला असला तरी, ते प्रत्यक्षात केव्हा आणि कशा स्वरूपात लागू होईल, हे महत्त्वाचे राहणार आहे. राज्यातील महिलांनी सरकारवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!