
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात 1984 शीखविरोधी दंगलीसाठी माफी मागितली. त्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात ब्राउन विद्यापीठात झालेल्या एका प्रश्नोत्तर सत्रात 1984 शीखविरोधी दंगलीवर स्पष्ट भूमिका घेतली. त्या काळात मी उपस्थित नव्हतो, पण काँग्रेस पक्षाचे जे काही चुकलं, त्याची जबाबदारी घेण्याची तयारी आमच्याकडे आहे. असं राहुल गांधी यांनी एका शीख युवकाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. युवकाने थेट काँग्रेसच्या भूतकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाच्या कालखंडाशी तुलना केली.
भाजपाच्या सत्तेत आम्हाला फक्त पगडीच नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेसच्या काळात नव्हते. असं म्हणत त्याने सज्जन कुमारसारख्या नेत्यांचे उदाहरण दिले. अशा नेत्यांना का वाचवलं जातं? या प्रश्नाने राहुल गांधींना थोडसं अडचणीत टाकलं. या वक्तव्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, 1984 मध्ये काँग्रेसने जे केलं, ते पाप होतं. शिखांना देशभरात मारलं गेलं, बेघर केलं गेलं.

मराठा समाजाचे आरक्षण
राहुल गांधी यांनी आता माफी मागितली, पण ही माफी जर त्यावेळी मागितली असती तर योग्य ठरलं असतं. डॉ. फुके यांनी राहुल गांधींवर आरोप केला की ही माफी केवळ काँग्रेसच्या पडत्या काळात, राजकीय लाभासाठी मागितली गेली आहे. आज देशभर काँग्रेसची गळती सुरू आहे. अशा वेळी ही माफी म्हणजे त्यांच्या राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. त्यांना पप्पू म्हणतात ते यासाठीच, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणावरही भाष्य केलं.
जातीनिहाय जनगणना लवकरच होणार आहे. त्यानंतरच समजेल की कोणत्या समाजाची लोकसंख्या किती आहे. त्यानुसार योजना राबवल्या जातील. जरांगे पाटील यांना घाई न करता वाट पहावी लागेल, असं सांगत त्यांनी समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन केलं. जर खरंच मराठा समाज 32 टक्के असला तर त्यांना हक्काचं आरक्षण मिळायलाच हवं. पण आता काही लोक फक्त स्टंटबाजी करत आहेत. हर्षवर्धन सपकाळ सारखे काही नेते पक्षात वरून लादले गेले आहेत.
काँग्रेसची प्रतिमा मलिन
सपकाळांना कोणताही जनाधार नाही, अशी टीका करत डॉ. फुके यांनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. राहुल गांधींचं अमेरिकेतून दिलेलं विधान हे भाजपाच्या मते देशाच्या प्रतिमेला धक्का देणारं आहे. देशातच नव्हे तर आता जगातही राहुल गांधींना पप्पू म्हटलं जाईल, असं वादग्रस्त विधान डॉ. फुके यांनी केलं. त्यांनी असा आरोपही केला की काँग्रेस आंतरराष्ट्रीय मंचावरून भारताविरोधात बोलून आपली मलिन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.