
वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली, त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. परिणय फुके यांनी त्यांच्यावर गोंधळलेले असल्याचा आरोप केला.
सध्या देशभर गाजत असलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय पटावरही उमटताना दिसत आहे. बुधवारी मध्यरात्री संसदेत हे विधेयक मंजूर करण्यात आले, मात्र त्यावर काँग्रेसने आणि विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला जात आहे. दुसरीकडे, या मुद्द्यावरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भाजप नेत्यांनी ठाकरे यांना धारेवर धरले आहे. आता माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनीही ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना डॉ परिणय फुके यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. या विधेयकाचा झेंड्यावरच्या हिरव्या रंगाशी काय संबंध उद्धव ठाकरे यांना हे विधेयक समजलेले आहे का असा सवाल त्यांनी केला. फुके यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विधानांमधील विसंगतीकडे लक्ष वेधले आणि त्यांनी आधी आपसात चर्चा करून ठरवावे, नेमके काय बोलायचे, असा सल्ला दिला. फुके यांनी पुढे सांगितले की, वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरांच्या आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर दावा करत आहे. हे विधेयक हे थांबवण्यासाठी आहे.

Parinay Fuke : ऐतिहासिक निर्णयाने भ्रष्टाचाराला आळा, गरीब मुस्लिमांना न्याय
हिंदू जमिनीचा मुद्दा
डॉ. परिणय फुके यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करत म्हटले की, वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेत होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुद्द्यांचे विषयांतर करत ट्रम्प आणि अमेरिकेच्या राजकारणावर भर दिला. वक्फ कायद्यावर बोलण्याऐवजी अमेरिकेचे दाखले देऊन संभ्रम निर्माण करण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असा आरोप फुके यांनी केला. परिणय फुके यांनी स्पष्ट केले की, वक्फ बोर्डाने देशभरातील हिंदू मंदिरांची, शेतकऱ्यांची आणि अन्य धार्मिक-सामाजिक संस्थांची मोठ्या प्रमाणात जमीन बळकावली होती. मात्र, नव्या विधेयकामुळे हिंदू बांधवांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याची मोठी संधी आहे.
लोकसभेने वक्फ सुधारणा विधेयकावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी गंभीर आरोप करताना, हे विधेयक फक्त वक्फ जमिनींवर डोळा ठेवून आणले आहे, असे सांगितले. यासोबतच त्यांनी भाजपवर उपरोधिक टीका करत, जर भाजपला मुसलमानांचा तिटकारा असेल, तर त्यांनी आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा, असे आव्हान दिले. ठाकरेंच्या या विधानावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक भाजप नेते त्यांच्यावर आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहेत.