
भंडारा जिल्हा परिषदेतील काही पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्याशी दगा केला. महायुतीचा साथ सोडत काहींनी काँग्रेसचा हात धरला आहे. याचा परिणाम आता सगळ्यांना भोगावा लागणार आहे.
महायुतीच्या हातून जिल्हा परिषदेची सत्ता बळकावण्यात आमदार नाना पटोले यशस्वी झालेत. मात्र जिल्हा परिषदेत पटोले समर्थक पदाधिकाऱ्यांची अवस्था तेलही गेले अन् तुपही अशी होणार आहे. महायुतीमधील काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत काँग्रेसनं गेम खेळण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्याशी दगा केला. आता या सगळ्यांनाच डॉ. फुके यांच्या क्रोधाचा सामना करावा लागणार आहे. पुढील अडीच वर्ष. भंडारा जिल्हा परिषदेत डॉ. फुके यांच्याशी दगा करणाऱ्या साऱ्यांचीच कुंडली तयार होत आहे. या कुंडलीनुसार प्रत्येकाच्या पापांचा हिशोब होणार आहे. त्यामुळं अनेकांना आता शनीची कडक ढय्या लागणार आहे.
जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर लगेचच त्याचे परिणाम दिसू लागले. सरकारी पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बदली झाली. यासंदर्भात केवळ ‘द लोकहित लाइव्ह’ने वृत्त प्रकाशित केले होते. सत्तांतर झाल्यानंतर सीईओंनी बदली होणार असं या बातमीत ठामपणे नमूद होतं. ‘द लोकहित लाइव्ह’चं हे वृत्त तंतोतंत खरं ठरलं. मिलिंद साळवे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुढील अडीच वर्ष जिल्हा परिषदेत वेगळंच ‘अॅक्शन’ बघायला मिळणार आहे.

जयंतीच्या दिवशी Rahul Gandhi यांच्याकडून जाणत्या राजाचा अवमान
चैन पडणार नाही
सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन यांचा अभिमान या चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातील किशोर कुमार यांचं गाण आजही हिट आहे. ‘चैन नहीं बाहर, चैन नहीं घर में रे..’ हे त्या गिताचे बोल आहेत. अशीच काहीशी अवस्था आता भंडारा जिल्हा परिषदेत तयार होणार आहे. डॉ. फुके यांच्याशी दगा करणाऱ्यांना या गीताचे बोल वारंवार आठवतील. त्याला कारण म्हणजे त्यांच्या समोर आता पुढील अडीच वर्ष अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळं भंडारा जिल्हा परिषदेवर ताबा मिळवूनही काँग्रेसचा ‘हात’ खालीच राहणार आहे. आमदार नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी काँग्रेसनं काढली आहे. त्यांना विधिमंडळाचं गटनेताही करण्यात आलेलं नाही. त्यामुळं सध्या नाना पटोले यांना काँग्रेसनं दात नसलेला वाघ केलं आहे.
पटोले यांच्याबाबत अद्याप काँग्रेसनं कोणतेही पत्ते खुले केलेले नाही. केंद्रीय पातळीवर त्यांना मोठी जबाबदारी मिळेल असं सांगण्यात येत आहे. परंतु भंडाऱ्याच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. एका पाठोपाठ अनेक राज्य भाजप जिंकत चालली आहे. त्यामुळं आगामी काही वर्ष तरी भाजपचाच बोलबाला राहणार आहे. अशात महाराष्ट्रातही भाजपच वरचढ आहे. त्यामुळं एका भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता मिळवून काय फायदा होणार? याचा विचार काँग्रेसनं कदाचित केला नव्हता. हाच विचार महायुतीशी दगा करणाऱ्यांनीही केला नव्हता. त्यामुळे ‘ओव्हर कॉफिडन्स’मध्ये अनेकांनी पावलं टाकली. आता त्याचे चौफेर फटके भंडारा जिल्हा परिषदेतील अनेकांना पुढील अडीच वर्ष सहन करावे लागणार आहे. त्याची सुरुवात लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत.