
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना सगळ्या जवळचे मित्र वाटायचे ते शरद पवार. आपल्या याच जुन्या मित्राची भेट घेण्याची संधी मोंदीना मिळाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर.
महाराष्ट्राच्या राजकारणात आजही शरद पवार हे नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं. पवार कधी कोणाच्या राजकारणाचा कसा गेम पलटवतील हे सांगता येत नाही. रपरप पडणाऱ्या पावसात शरद पवारांनी ओले चिंब होत एक सभा घेतली. या सभेनंतर तेव्हाच्या भाजप-शिवसेना युतीला त्यांनी अक्षरश: धुवून काढलं. महाविकास आघाडीचे जनकही शरद पवारच. उद्धव ठाकरे यांना भाजपपासून वेगळं काढण्यात पवारांचा मोठा हातखंड असल्याचं आजही बोललं जातं. राजकारणातील या चाणक्यची भेट घेण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, 21 फेब्रुवारीला साधली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका व्यासपीठावर आलेत. यावेळी मोदींनी असं काही केलं की राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मोदींनी स्वत: पवारांसाठी खुर्ची मागे घेतली. त्यांना आदरानं स्थान दिलं. त्यानंतर जवळच असलेल्या बाटलीतून पवारांच्या ग्लास भरला. आपल्या या जुन्या मित्राला व महाराष्ट्रातील प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रमुखाला त्यांनी पाणी पाजलं. अजितदादांना काका शरद पवारांपासून दूर करून तसंच भाजपनं त्यांना पाणी पाजलं आहे. परंतु शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी आपल्या कृतीतून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न केला याची चर्चा आता जोरात आहे.

शिवसेनेला टेन्शन
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आपल्याला भेटायचे असं स्वत: शरद पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. पवार त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. अनेक तासापर्यंत मोदी पवारांकडं असायचे. मोदी यांनी राजकारणात पवार आपले गुरू असल्याचं वक्तव्यही केलं होतं. त्यावर पवारांनी मिश्किल टिप्पणीही केली होती. पंतप्रधान होण्यापूर्वी पवारांनी केलेली दिल्लीतील मदत स्मरणात असेल म्हणूनही कदाचित मोदींनी साहित्य संमेलनात पवारांना असा मान दिला असावा अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. राजकारणात शरद पवार यांच्या नंतर नरेंद्र मोदी हे विनाकारण कोणतीही गोष्ट न करणारे नेता म्हणून ओळखले जातात. अगदी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी एखाद्या पद्धतीनं सॅल्यूट केला तरी त्या सैन्य विभागात कालांतरानं मोठी घडामोड बघायला मिळते.
महाराष्ट्रात निवडणुकीचा फड रंगण्यापूर्वी केंद्र सरकारनं मराठीला अभिजात दर्जा दिला. निवडणुकीपूर्वी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी रान पेटवलं होतं. मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही महाराष्ट्राचं दैवत आहे. मराठी हे राज्याचं मन आहे तर छत्रपती शिवाजी महाराज आत्मा. त्यामुळं नरेंद्र मोदी यांनी आवर्जून मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली. त्यातून मराठी माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल पुन्हा एक वेगळा संदेश गेला आहे. या कार्यक्रमात मोदी यांनी पवारांशी साधलेली सलगी शिवसेनेसाठी टेन्शन देणारी ठरू शकते.
बाळासाहेब अन् साहेब
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे चांगले मित्र होते, हे सर्वश्रूत आहे. पायाखालची वाळू सरकावी अगदी तशाच पद्धतीनं बहुमत मिळाल्यानंतरही पवारांनी भाजपकडून सत्ता हिसकावली. अर्थात त्याची परतफेड भाजपची ‘सूद समेत’ केली. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलीक यांना कोठडीत जावं लागलं. अजितदादांना काकांचा हात सोडावा लागला. महाविकास आघाडीचं अख्खं मंत्रिमंडळ घेऊन भाजप गुवाहाटीला पळाली. त्यामुळं भाजपनंही पवारांना कमी धक्के दिले असं नाही. घरच्याच माणसाला हाताशी धरून भाजपनं काकांचा पक्ष अन् चिन्हही हिसकावून घेतलं. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळं अनेकांनी चिंताही व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कृतीतून कदाचित नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आता थकले. म्हातारे झाले, असा संदेशन देण्याचाही प्रयत्न केला. मराठी माणसाचा सन्मान दिल्लीही करते हा संदेशही यातून गेला. त्यामुळे महाराष्ट्र गितातील ‘दिल्लेचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या बोलांनाही वजन मिळालं. शेजारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते. त्यामुळं भविष्यात फडणवीस मोदींच्या जागी जाऊ शकतात, या संदेशही मोदींनी मराठी माणसापर्यंत पोहोचविला. पवारांसाठी पाण्याचा ग्लास भरूनही त्यांनी सेवाभाव केल्याचं दाखवून दिलं. महाराष्ट्रात अतिथी घरी आला की, त्याला सगळ्यात आधी पिण्यासाठी पाणी दिलं जातं. शुक्रवारच्या कार्यक्रमात पवार हे दिल्लीत अतिथी होते. त्यामुळं मोदींनी त्यांना पाणी देत अतिथी धर्मही पाळला अन् पवारांना पाणी पाजल्याची वाहवाही देखील मिळवली.
आपापला प्रपोगंडा
पवारांना मोदींनी पाणी पाजलं याचा प्रपोगंडा भाजपनं आपल्या स्टाइलनं केला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही आमचे साहेबच कसे मोठे, हे दाखवून देणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या. पवार आणि मोदी यांच्या या कृतीतून मात्र एक संदेश आणखी केला. भाजपनं प्रसंगी एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जवळ केलं. अगदी तसंच शरद पवार नावाचा पत्ताही त्यांच्या जवळ असल्याचं त्यांनी दादांना दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं भाजपसाठी सगळे पर्याय खुले असल्याचंही सगळ्यांनाच कळलं. यापूर्वी नमूद केल्याप्रमाणं शरद पवार अन् नरेंद्र मोदी विनाकारण काहीच करत नाहीत. अभिजात मायेच्या व्यासपीठावर राजकारणातील या दोन दिग्गजांचा ‘मिल बैठे दो यार’चा सिन बरेच काही बोलून जाणारा आहे. आता यातून कोण काय बोध घेतो, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.