
गडचिरोली नक्षलवाद्यांची गोळी लागल्यानंतर एका जवानाला विरगती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी लक्षलांचा सफाया करण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
नक्षलवाद्यांचा सफाया करण्यासाठी गडचिरोलीत मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान हल्ल्यात एक जवान शहीद झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आणि सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहिमेला आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. जंगलात लपलेल्या अशा समाजविघातक प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकार आणि पोलिस दलाने अनेकदा नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी संधी दिली होती. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी पुनर्वसनाच्या योजना राबविल्या जात आहेत, मात्र तरीही काही जण विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत. अशांवर आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही.

नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित
गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि आसपासच्या जंगलांमध्ये पोलिस आणि सीआरपीएफच्या विशेष पथकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज जवान आता नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जंगलात घुसले आहेत. हेलिकॉप्टर, ड्रोन आणि गुप्तचर माहितीच्या आधारे ऑपरेशन राबवले जात आहे.
गडचिरोलीसारख्या भागात रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, नक्षलवादी सतत विकासाला विरोध करत आहेत. आता अशा समाजविघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी गोळ्यांनी उत्तर देण्याचा इशारा सुरक्षा दलांनी दिला आहे.
गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर?
पोलिसांचे आवाहन
नक्षलविरोधी कारवाई दरम्यान कोणत्याही निर्दोष नागरिकाला त्रास होऊ नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन विशेष काळजी घेत आहे. स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलांना सहकार्य करावे आणि नक्षलवाद्यांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीत एक जवान शहीद झाल्यानंतर प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे. आता फक्त दोनच पर्याय उपलब्ध आहेत. शांततेच्या मार्गावर यावे किंवा कठोर कारवाईला सामोरे जावे. पुढील काही दिवसांत नक्षलविरोधी कारवाई अधिक तीव्र होणार असून, महाराष्ट्र पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दल सज्ज झाले आहे. आता नक्षलवाद्यांचा कोंडमारा अटळ आहे, असे चित्र दिसून येत आहे.