
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाचा ताप वाढताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा जोरात सुरू आहे. आधी मुख्यमंत्रीपद, मंत्रिमंडळविस्तार,खातेवाटप आणि नंतर पालकमंत्री पदांचं वाटप यांवर मोठा वादंग निर्माण झाला आहे. सरकारमध्ये पुन्हा नाराजीचं वातावरण निर्माण झालंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सोशल वॉर रूम या महत्वाच्या प्रकल्पाबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मात्र, या महत्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने सरकारमधील अंतरंग उघड झाले आहे. सदर बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण शिंदे यांचं वैयक्तिक कारण असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, राजकीय निरीक्षकांना हे कारण पुरेसं वाटत नाही. काही महिन्यांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये ताण निर्माण झाल्याच्या चर्चांना आता नव्या घटनेने बळ मिळालंय. शिंदे आता ठाण्याहून मुंबईला रवाना झाले असल्याचं समोर आलंय, पण त्यांच्या गैरहजेरीने सरकारमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

महायुतीतून नाराजीचा सूर?
पालकमंत्री पदांच्या वाटपावरून महायुती सरकारमध्ये आधीच नाराजी आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तींना स्थगिती देण्याची वेळ आल्यानंतर महायुतीतील कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तेजीत आलं आहे. शिंदे यांना मिळालेल्या जबाबदाऱ्यांवरूनही अनेक नाराजीच्या कथा समोर येत आहेत.
महायुती सरकारमध्ये अजित पवारांच्या विश्वासू नेत्यांनीही नाराजीचा सूर लावला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विक्रम काळे यांनी भर कार्यक्रमात मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली. पहिल्यांदाच आमदार झालेली मंडळी पाठीमागून कधी पुढे गेली, हे समजलं नाही, असं स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर निशाणा साधला. काळे यांनी राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंचं उदाहरण देत, माझ्या मागून आलेले मंत्री झाले, पण मी अजूनही आमदारच आहे, अशी खंत मांडली. त्यांनी आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा असून ती लवकर मिळणार नाही, असंही सूचक विधान केलं.
खळबळ वाढणार?
महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी अंतर्गत वाद आणि कुरघोड्यांमुळे सरकारचं कामकाज अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाची नाराजी, अजित पवार गटातील खदखद, आणि भाजपच्या रणनीतीमुळे महायुतीत शांतता राहील का, हा मोठा प्रश्न आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे यांच्या गैरहजेरीमागील कारण गंभीर असू शकतं. जर महायुतीत हे वाद असेच सुरू राहिले, तर आगामी काळात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.