महाराष्ट्र

Ram Navami : बटोगे तो कटोगे म्हणणारेच साजिद खान यांच्या मंचावर 

Akola : आमदाराने रामनवमी शोभायात्रेचे स्वागत केल्याने शहरात राजकीय गदारोळ

Share:

Author

अकोल्यात श्रीराम नवमी शोभायात्रेचे आगळंवेगळं दर्शन यंदा घडल आहे. भाजपचे काही नेते साजिद खान पठाण यांच्यासह रामनवमी शोभा यात्रेचे स्वागत करताना दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यात चांगलाच राजकीय गदारोळ उडाला आहे. 

अकोला शहरात श्रीराम नवमीचा सण म्हणजे उत्सवांची पर्वणी. संपूर्ण शहर भगव्या झेंड्यांनी नटलेलं, जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमलेलं आणि रामभक्तांच्या उत्साहाने गगनात भरारी घेतलेलं असं दृश्य अनुभवायला मिळालं. वर्षानुवर्षांची परंपरा जपणारी भव्य शोभायात्रा यंदा काहीशा वेगळ्या रंगात रंगलेली दिसून आली.

यावर्षी श्रीराम नवमीची शोभायात्रा राजकीय दृष्टिकोनातूनही विशेष ठरली. कारण अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे मुस्लिम आमदार साजिद खान पठाण यांनी स्वतः शोभायात्रेचं स्वागत करत जय श्रीरामचा गजर केला. भाजपच्या वर्चस्वाखाली असलेल्या या यात्रेत साजिद खान पठाण यांचा सहभाग म्हणजे केवळ धार्मिक सलोख्याचं नव्हे, तर अकोल्याच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे.

Akola : भाजपच्या गडातील शोभायात्रेचे साजिद खान करणार स्वागत 

स्टेजवर एकत्रित

साजिद खान पठाण यांनी शोभायात्रेदरम्यान मंचावर संपूर्णवेळ उपस्थित राहून श्रीरामाचे नाम घेतले, आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचंही स्वागत केलं. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचं प्रतिबिंबही उमटलं. भाजपच्या काही ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मंचावर त्यांच्यासोबत दिसले, तर काहींनी मात्र मंचावर जाणं टाळून अलिप्तता जपली. गेल्या काही महिन्यांपूर्वी अकोल्यात झालेल्या दंगलीमागे साजिद खान यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर त्याच साजिद खान यांच्यासोबत भाजप नेते एकत्र मंचावर दिसणं, हे अनेकांच्या आश्चर्याचं आणि चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे.

विशेष म्हणजे, दिवंगत भाजप नेते आमदार गोवर्धन शर्मा यांचे पुत्र कृष्णा शर्मा देखील या मंचावर साजिद खान पठाण यांच्यासोबत उपस्थित होते. अकोल्यातील काही भाजप नेत्यांची साजिद खान यांच्यासोबत मैत्री आणि स्नेहाचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या नेत्यांनी सावध भूमिका घेत मंचावर जाणं टाळलं. “जर मंचावर गेलो, तर कोंडीत सापडू,” अशी भावना काही नेत्यांमध्ये असल्याचे जाणवले. शोभायात्रेत आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे अनेक भाजप नेत्यांनी स्वतःहून जय श्रीरामचे नारे लावत साजिद खान पठाण यांच्यासोबत श्रीरामाचे नाम घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. शोभायात्रेच्या निमित्ताने झालेले हे स्वागत काहींनी मतांसाठीचा ‘राजकीय खेळ’ असल्याची कुजबुजही केली.

Ramdas Tadas : माजी खासदारांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारला

नागरिकांचा टोला 

एकेकाळी “बटेंगे तो कटेंगे” असे नारे देणाऱ्या भाजप नेत्यांनी यंदा साजिद खान पठाण यांच्यासह राम नवमी साजरी करत शोभायात्रेचे स्वागत केले. त्यामुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये भाजपवर टीका सुरू झाली आहे. “बटोगे तो कटोगे के नारे देने वाले सभी हिंदुत्ववादी संगठन के पदाधिकारीयो का भव्य स्वागत हुआ है जी”, अशा शब्दांत काही नागरिकांनी भाजपवर उपरोधिक टोले लगावले आहेत.

अकोल्यात अनेक वर्षांपासून भाजपची मजबूत पकड असतानाही यंदा काँग्रेस आमदाराच्या हस्ते शोभायात्रेचं स्वागत होणं हे राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत मानले जात आहेत. राम नामाचा जयघोष साजिद खान पठाण यांच्यासारख्या मुस्लिम आमदाराच्या मुखातून ऐकायला मिळणं, हे अनेकांना पचनी पडलेलं नाही.

अकोल्यातील या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट निश्चित जाणवली की, यंदाची रामनवमी ही फक्त धार्मिक नाही, तर राजकीय दृष्टिकोनातूनही ऐतिहासिक ठरली आहे. त्यामुळे “हे राम नाम कोणाला तारते आणि कोणाला मारते? यावर अकोल्यातील जनतेचं लक्ष वळलं आहे.

साजिद खान यांच्या सोबत मंचावर कृष्णा गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष शैलेन्द्र कागलीवाल, राहुल राठी, प्रकाश लोडिया, सिद्धार्थ शर्मा, दिलीप खतरी, मनोज खंडेलवाल, बबनराव चौधरी, आकाश कवडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!