
नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपने हातमिळवणी करत मौदा खरेदी-विक्री संघाची निवडणूक जिंकली. वंचितांवर टीका करणारे राजकीय दलाल मात्र गप्प बसले, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केला.
नागपूरच्या राजकारणात एक मोठा स्फोट घडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्यावर थेट आणि सडेतोड सवालांचा मारा करत राजकीय गल्लीतील ‘दोगलेपणाचं’ भांडाफोड केलं आहे. जर वंचित बहुजन आघाडीने भाजपसोबत युती केली असती, तर आम्हाला दिवस-रात्र ‘भाजपची B-टीम’ म्हणून हिणवलं गेलं असतं. मग आता काँग्रेस आणि भाजपने नागपुरात युती केली, तर सगळे गप्प का? असा संतप्त सवाल करत आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.
आंबेडकर म्हणाले की, नागपुरात मौदा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीचा पॅनल जिंकला. म्हणजे काँग्रेस आणि भाजपने मिळून युती केली. या युतीवर देशभरातील विश्लेषक, पत्रकार, इंटरनेट योद्धे, तथाकथित बुद्धिवंत सगळेच गप्प. यांना आता B-टीम दिसत नाही का? राजकीय दलाल आता का शांत आहेत? ते पुढे म्हणाले की, हेच जर वंचित बहुजन आघाडीने केलं असतं, तर आमच्यावर ‘सावरकरवादी’, ‘संघप्रेमी’, ‘B-टीम’ अशी लेबले चिकटवली गेली असती. इंटरनेटवर लेख, टीका, भाषणं सुरू झाली असती. पण आज सगळे गप्प आहेत. कारण काँग्रेस आणि भाजप यांची युती झाल्यावर हे तथाकथित लोक ‘दोगलेपणा’ करतात.

Nagpur : धोटे सरांनी लिहिले भ्रष्टाचाराचे यशस्वी शैक्षणिक मॉडेल
विरोधी आले एकत्र
नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने थेट युती केली, आणि दोन्ही पक्षांच्या संयुक्त पॅनलने मोठा विजय मिळवला. या पॅनलमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर यांचा समावेश होता. या पॅनलमधील सर्व 13 उमेदवार निवडून आले. यामध्ये एकजण तर अगोदरच बिनविरोध विजयी ठरला होता. दुसऱ्या बाजूला, अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) निवडणुकीत साफ पराभूत झाला. NCP जिल्हाध्यक्ष बाबा गूजर यांचा पॅनल पूर्णपणे हरला. गूजर यांनी आरोप केला की, भाजपने आमच्यावर दबाव टाकला, धमकी दिली आणि याविरोधात आम्ही अजित पवारांकडे तक्रार करू.
आंबेडकरांचा रोष
विशेष बाब म्हणजे, सुनील केदार आणि भाजप यांच्यात गेल्या अनेक निवडणुकींपासून तीव्र शत्रुत्व आहे. लोकसभा निवडणुकीत केदार यांनी भाजपविरोधात उघड प्रचार केला होता आणि एक काँग्रेसचे खासदार देखील निवडून आणले होते. परिणामी, भाजपने केदार यांना त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं आणि त्यांचे सर्व समर्थकही हरवले. पण या सर्व भूतकाळाच्या वैराला तिलांजली देत, केदार आणि भाजप आता एकत्र आले आहेत आणि सगळे गप्प आहेत. हीच बाब वंचित आघाडी आणि आंबेडकरांच्या रोषाचे केंद्रबिंदू आहे.
‘मूक संमती’वर सवाल
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानांनंतर एक मोठा प्रश्न उपस्थित होतो की, राजकारणात नैतिकतेचा खरा सवाल कोण विचारणार? वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करणाऱ्या तथाकथित “प्रगतीशील” वर्गाने काँग्रेस-भाजप युतीवर मौन का बाळगलं? हा मूकपणा म्हणजेच त्यांचा खरा चेहरा आहे. हेच ‘दोगलंत्व’ लोकशाहीसाठी घातक आहे, अशी आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-भाजप युतीवरून केवळ राजकीय पक्षच नाही, तर पत्रकार, विश्लेषक, बुद्धिजीवी वर्गालाही जबरदस्त प्रश्न विचारले आहेत. नागपूरमधील स्थानिक निवडणूक असली, तरी यातून बाहेर पडणारा संदेश स्पष्ट आहे, राजकीय दुटप्पीपणा आणि निवडक टीकेचं राजकारण वंचितांना मान्य नाही.