महाराष्ट्र

Prakash Ambedkar : निवडणूक संपली तरी मतदान सुरूच 

Assembly Elections : वंचित बहुजन आघाडीचा स्फोटक दावा

Author

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 76 लाख मते उशिरा टाकली गेल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा थेट न्यायालयात नेत विरोधकांच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरही तब्बल 76 लाख मते अधिक टाकली गेली असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही या निवडणुकीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत अन्य नेत्यांच्या निष्क्रियतेवर घणाघाती टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, मतदानाची वेळ संपल्यानंतरही 76 लाख मते अधिक टाकली गेली. पण राहुल गांधींपासून शरद पवारांपर्यंत कुणीही या प्रकरणी कोर्टात गेलेले नाहीत. न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाकडून रेकॉर्ड मागण्याचे धाडस आजवर कोणत्याही मोठ्या नेत्याने दाखवलेले नाही, हे त्यांचं ठाम मत आहे.

Amol Mitkari : दादांच्या मुख्यमंत्री पदासाठी विठोबाच्या चरणी आमदारचे साकडं

कायदेशीर लढा सुरू

घडलेल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चेतन अहिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने स्वीकारली आहे. याचिकेच्या आधारे भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः या खटल्यात चेतन अहिरे यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा खटला केवळ निवडणूक प्रक्रियेतल्या तांत्रिक दोषांपुरता मर्यादित न राहता लोकशाहीच्या सखोल प्रश्नांवर बोट ठेवणारा आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, यासाठी वंचित बहुजन आघाडीचा हा कायदेशीर लढा महत्त्वाचा ठरत आहे.

राहुल गांधी यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, ज्या काँग्रेसला जनतेने साफ नाकारले, ती आता जनादेशावरच शंका घेते आहे. त्यांच्या मते, जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. आता ती लोकशाही संस्थांवरच शंका घेत आहे. फडणवीस यांनी काँग्रेसवर आरोप केला की, मतदान यंत्रांवर संशय घेणे हे त्यांच्या पराभवाचे एक ठराविक धोरण बनले आहे. अशा प्रकारे निवडणुकीच्या निकालावर टीका करून काँग्रेस पक्ष लोकशाही प्रक्रियेवरच सावट निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.

Narendra Bhondekar : स्वबळाच्या दाव्यानंतर महायुतीने करून दिली आठवण 

बिहारपर्यंत पोहोचलेले पडसाद

महायुतीला 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले. एकूण 288 पैकी 230 जागा महायुतीच्या खात्यात गेल्या. भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या, तर शिंदे गटाला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 46 जागा मिळाल्या. महाविकास आघाडी मात्र केवळ 46 जागांवर अडकली. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 16, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. सपला 2 जागा मिळाल्या तर इतरांना 10 जागा मिळाल्या.

मतदानाचे प्रमाण 2024 मध्ये एकूण 65.11 टक्के इतके होते. जे 2019 मधील 61.4 टक्क्यांपेक्षा 4 टक्के अधिक आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या मते ही वाढ नैसर्गिक नव्हे, तर कृत्रिम आहे. त्यांचा दावा आहे की मतदान संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात मते टाकली गेली. यामुळेच आकडेवारी वाढली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले होते की, महाराष्ट्रातील मॅच फिक्सिंगसारखे प्रकार भविष्यात बिहारसारख्या राज्यांमध्येही दिसू शकतात. त्यांच्या या वक्तव्याने केंद्रातील सत्ताधाऱ्यांवरही अप्रत्यक्षपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचा आरोप केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. निवडणुकीत पारदर्शकता, मतपेट्यांवर विश्वास आणि न्यायालयीन मार्गाचा वापर हे या चर्चेचे मूळ स्वरूप ठरत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!