महाराष्ट्र

Prakash Ambedkar : गोळ्या संपल्या त्यांच्या, पण संधी दवडली आपण 

Indo-Pak War : प्रकाश आंबेडकरांचे केंद्र सरकारवर रोखठोक प्रश्न 

Author

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान निर्णायक क्षणी माघार घेतल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी आणि आरएसएसने याचा खुलासा करावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान, आपण विजयी स्थितीत असूनसुद्धा माघार का घेतली? ही लढाई आपण का हरलो? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) स्पष्ट करून सांगितले पाहिजे, अशी ठाम आणि रोखठोक मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात नेतृत्व हे निर्णायक ठरतं, आणि मोदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याची ऐतिहासिक संधी हातून घालवली, असा आक्रोश त्यांनी केला.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नांचा भडिमार केला. गल्लीतील भांडण जिंकण्यासाठी आक्रमकपणा आवश्यक असतो, आणि जागतिक स्तरावरही हेच तत्त्व लागू होतं. मग तुम्ही पाकिस्तानविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावर असताना पाय मागे का घेतले? ही माघार ही फक्त भिती, दबाव की कचखाऊपणाचं निदर्शक आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

भारत एकटाच

पंतप्रधान मोदींनी विविध देशांना भेटी दिल्या, मैत्रीचे पूल बांधले, संरक्षण करार केले, पण संघर्षाच्या निर्णायक क्षणी एकही राष्ट्र उघडपणे भारताच्या बाजूने उभं राहिलं नाही. हे अपयश केवळ परराष्ट्र धोरणाचं नसून, नेतृत्वाच्या कमकुवतपणाचं द्योतक असल्याचं आंबेडकर म्हणाले. रशियासारखा पारंपरिक मित्रसुद्धा पाकिस्तानला मदत करताना दिसतो, ही गंभीर बाब आहे. 1972 मध्ये रशिया भारतासोबत ठामपणे उभा राहिला होता. मग आज का नाही? आणि फ्रान्स ज्याच्याकडून आपण राफेलसारखी महागडी लढाऊ विमाने विकत घेतली, तो फ्रान्सही मौनात का राहिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आंबेडकर यांनी यावेळी एक अत्यंत महत्त्वाची बाब उघड केली. पाकिस्तानकडे केवळ दहा दिवस पुरेल एवढा दारुगोळा होता. जर आपल्याकडून योग्य निर्णायक आक्रमण केलं असतं, तर आपल्याला पाकिस्तानवर हव्या त्या अटी लादता आल्या असत्या. पण आपण स्वतःहून लढाई मागे घेतली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी टीका करत त्यांनी आरएसएसलाही लक्ष्य केलं. संघावाल्यांना आम्ही विचारतोय, तुम्ही प्रत्येकवेळी पाकिस्तानविरुद्ध हरता का?

Devendra Fadnavis : सिंह जागा आहे, पण गर्जना योग्य वेळी 

शहीद दर्जा नाही

संघर्षादरम्यान वीरमरण आलेल्या अग्निवीर मुरली नाईक यांचा उल्लेख करत आंबेडकरांनी केंद्र सरकारच्या अग्निवीर धोरणावर कडाडून टीका केली. मुरली नाईक यांनी देशासाठी प्राण दिला, पण ‘शहीद’ म्हणून त्यांना ओळख दिली जात नाही. त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाहीये. हे अन्यायकारक नाही का? शासकीय सुविधांचा आणि सन्मानाचा त्यांचा अधिकार का नाकारला जातोय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी लवकरच आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

देशाच्या सुरक्षेचा प्रश्न फक्त निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा किंवा सरकारपुरताच मर्यादित नाही. तो सामान्य जनतेचाही आहे. त्यामुळे जनतेनेही याबाबतीत सजग राहायला हवे आणि थेट सरकारला यावर जबाबदारीने प्रश्न विचारले पाहिजेत, असा सल्लाही आंबेडकरांनी यावेळी दिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!