
भीमा कोरेगाव दंगल प्रकरणाच्या चौकशी आयोगासमोर आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत शरद पवारांचे पत्र रेकॉर्डवर घेण्याची मागणी केली.
भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी आज चौकशी आयोगासमोर झालेली सुनावणी राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी ठरली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ते पत्र चौकशी आयोगाच्या रेकॉर्डवर घेण्याची स्पष्ट मागणी केली. या मागणीची दखल घेत आयोगाने लवकरच पुढील नोटीस जारी करण्याचा संकेत दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या सुनावणीसाठी चौकशी आयोगाकडे स्वतः अर्ज सादर केला होता. त्यांनी जाहीरपणे सांगितले की, शरद पवारांचे उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र आयोगासमोर सादर करणे आवश्यक आहे. या पत्रात पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे आयोगाने हे पत्र रेकॉर्डवर घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी आमची भूमिका आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

पत्राला राजकीय वळण
शरद पवार यांनी 2018 मधील कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट आरोप केले होते. या पत्रात पवार म्हणाले होते की, फडणवीस सरकारने सत्तेचा गैरवापर करून दंगलीचे सूत्रधार पाठीशी घातले. पोलिसांच्या मदतीनेच दंगलीचा कट रचला गेला. तसेच सादर केलेले पुरावे हे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगासमोर हा मुद्दा उपस्थित करत पवारांचे म्हणणे ऐकून घेण्याची मागणी केली आहे. आयोगाने ही मागणी ग्राह्य धरत संबंधित पत्र आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय तापमान पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Girish Mahajan : काश्मीरमधून परतीच्या वाटेवर भंडाऱ्याचे पर्यटक
इतिहास पुन्हा ऐरणीवर
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी विजय दिवस साजरा होत असताना हिंसाचार उसळला. लाखोंच्या संख्येने जमलेल्या दलित बांधवांवर अचानक दगडफेक, तोडफोड आणि गोंधळ निर्माण झाला. या घटनेचे लोण राज्यभर पसरले. समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चौकशी आयोगाची स्थापना केली होती.
प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारामुळे आणि शरद पवारांच्या पत्राच्या माध्यमातून या प्रकरणाला आता नव्याने गती मिळण्याची शक्यता आहे. आयोग पुढील सुनावणीत या पत्राची अधिकृत चौकशी करणार आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी येणार आहे. राज्याच्या राजकारणात नव्याने हलकल्लोळ होण्याची चिन्हं दिसत आहेत.