
एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून, 25 हजार स्वमालकीच्या बसेस खरेदीसह भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. चालक, वाहक, अभियंते आणि इतर पदांवर लवकरच मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.
आर्थिक दृष्टिकोनातून एसटी महामंडळाला सशक्त बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. येत्या काळात 25 हजार स्वमालकीच्या नव्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या विस्तारामुळे चालवण्यासाठी व व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. चालक, वाहक तसेच अभियंते व इतर विविध पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या तीनशे सातव्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. नव्या बसेसच्या खरेदीसह होणाऱ्या विस्तारामुळे विविध विभागांत तांत्रिकदृष्ट्या कुशल व सक्षम मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात नव्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

काळाची गरज
सरनाईक यांनी सांगितले की, महामंडळाच्या तत्कालीन आर्थिक स्थितीमुळे उच्च न्यायालयाने 2024 पर्यंत एसटीमध्ये भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता परिस्थिती सुधारत आहेत. अनेक अनुभवी कर्मचारी लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उद्भवणाऱ्या रिक्त जागा भरणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आकृतीबंधाला मान्यता देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
परिवहन मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील रिक्त जागांचा सविस्तर आढावा घेऊन एकत्रित मागणी शासनाकडे सादर करावी. त्यानुसार आवश्यक असलेल्या पदांची भरती नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येईल. हे नियोजन करार पद्धतीने तसेच सरळ सेवा भरतीद्वारे राबवले जाणार आहे.
रिक्त पदे लवकरच भरणार
महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये सध्या कुशल अभियंत्यांचा अभाव आहे. विशेषतः पीपीपी (PPP – Public Private Partnership) तत्त्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागांसाठी बांधकाम विभागात तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंत्यांची नितांत गरज भासणार आहे. या गरजा लक्षात घेऊन अभियंत्यांची रिक्त पदे लवकरच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या कमांड सेंटरमधून सुरक्षेचा नवा मंत्र
नव्या बसेस, वाढवलेले मनुष्यबळ आणि सक्षम व्यवस्थापन यामुळे एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि एसटीला परत एक विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा बनवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. भविष्यात एसटी ही केवळ प्रवासाची सुविधा न राहता, एक आधुनिक आणि लोकाभिमुख संस्था म्हणून ओळखली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या आगामी भरतीमुळे राज्यातील हजारो तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांनी यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कुशल, तांत्रिक आणि प्रशासनिक क्षमतांनी परिपूर्ण मनुष्यबळ एसटीच्या नव्या युगाचा भाग बनणार आहे. या निर्णयामुळे एसटीला नवे बळ मिळणार असून, संपूर्ण व्यवस्थापन यंत्रणा अधिक गतिमान व कार्यक्षम होणार आहे.