
एसटी महामंडळ हरित तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नवीन युगात प्रवेश करत आहे. पुढील पाच वर्षांत 25 हजार पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस रस्त्यावर धावणार असून, इंधन बचत आणि प्रदूषण नियंत्रणाचा दुहेरी उद्देश साधला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीला नवा श्वास देण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. ‘हरित आणि स्मार्ट एसटी’ या दृष्टीकोनातून महामंडळाने पुढील पाच वर्षांत तब्बल 25 हजार नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये 20 हजार बस सीएनजी, एलएनजी आणि डिझेल हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या असतील. 2025-26 पासून या पर्यावरणपूरक प्रवासाला अधिकृत सुरुवात होणार आहे.
सध्या एसटीच्या ताफ्यातील बहुतांश बसेस डिझेलवर चालतात. मात्र, डिझेलवरील खर्च आणि पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन एसटीने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बसेस डिझेल हायब्रीड तंत्रज्ञानावर चालतील आणि डिझेलचा वापर फक्त अत्यावश्यक परिस्थितीतच केला जाईल, असे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

काळाची गरज
सध्या महामंडळाचा जवळपास 34 टक्के खर्च केवळ इंधनावर होतो. दररोज सरासरी 10.7 लाख लिटर डिझेल वापरले जाते, आणि त्यावर वार्षिक सुमारे 34 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. डिझेलची अस्थिरता, पुरवठा आणि वाढती किंमत लक्षात घेता पर्यायी इंधनाचा वापर ही काळाची गरज आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
पर्यायी इंधनांमध्ये सीएनजी आणि एलएनजी हे डिझेलपेक्षा अधिक स्वस्त आणि पर्यावरणस्नेही आहेत. हायब्रीड बस सीएनजी आणि एलएनजीवर प्रति लिटर 5 ते 5.5 किमी पर्यंत चालतात, तर डिझेलवर केवळ 4 किमी अंतर पार करता येते. परिणामी, इंधन खर्चात मोठी बचत होते आणि हवामान प्रदूषणातही घट होते.
कोट्यवधींची बचत
एसटीने ‘किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत एलएनजी पुरवठ्यासाठी करार केला आहे. त्यानुसार एलएनजी इंधन डिझेलच्या तुलनेत 20 टक्के स्वस्तात मिळणार आहे. यामुळे एसटी महामंडळ दरवर्षी सुमारे 235 कोटी रुपयांची बचत करणार आहे. या नव्या उपक्रमासाठी आवश्यक इंधनसाठ्याची तयारीही जोमाने सुरू आहे. राज्यभरात 90 ठिकाणी एलएनजीचे पंप आणि ‘महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड’मार्फत 20 सीएनजी पंप उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
उत्पादकांना आमंत्रण
या पुढाकारासाठी विविध बस उत्पादक कंपन्यांकडून हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेसचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक, खर्च बचत करणारी आणि प्रवाशांसाठी आरामदायक अशी ही नवीन एसटी युगाची सुरुवात ठरणार आहे. प्रदूषणविरहित, कार्यक्षम आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीचा आदर्श निर्माण करण्यासाठी एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल महाराष्ट्राच्या हरित भविष्याकडे झेप घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.