देश

Pahalgam Attack : पीओके पंतप्रधानांचे भडक विधान, भारताला थेट धमकी

POK : भारत - पाकिस्तान संघर्ष शिगेला

Author

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील तणावाला नवीन ठिणगी पेटवली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानकडून भारतविरोधी वादग्रस्त विधाने आणि टोकाची पावले उचलली जात आहेत.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असतानाच, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा वादग्रस्त आणि भडक विधाने केली जात आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत.

प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे, ते म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके)चे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांचे खळबळजनक विधान. पहलगाम हल्ल्याचे समर्थन करताना त्यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, जर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी नागरिकांचे रक्त सांडले, तर दिल्लीपासून काश्मीरपर्यंत त्याची किंमत भारताला चुकवावी लागेल. आम्ही मागे हटणार नाही, रक्त सांडले तरीही आम्ही ठाम राहू. अन्वरुल हक पुढे म्हणाले, पीओकेचे सैनिक पूर्वी अशा कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत आणि भविष्यात अधिक तीव्रतेने सहभागी होतील. भारताला जे करायचं असेल ते करू दे, आम्ही कोणतीही भीती न बाळगता उत्तर देऊ. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील वातावरण अधिकच चिघळले आहे.

Chandrashekhar Bawankule : शिंदे, महाजन एकत्र कार्यरत आहेत

संबंध समाप्त

भारताने पहलगाम हल्ल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने तातडीने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीत भारताच्या कारवायांवर चर्चा झाली आणि त्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व व्यापारी संबंध तत्काळ संपवण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्रही भारतीय विमानांसाठी बंद केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे. भारताने सिंधू नदी पाणी करार एकतर्फी स्थगित केल्यावर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय युद्धसदृश कृत्य असल्याचा आरोप करत तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडण्याचा इशारा दिला आहे.

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात कार्यरत लष्करी सल्लागारांना 30 एप्रिलपूर्वी पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोन्ही देशांनी परस्पर दूतावासांमध्ये फक्त 30 अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने यासंदर्भात जागतिक बँकेला देखील दाद मागण्याचे ठरवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक बँक हा कराराचा एक भाग असल्यामुळे भारताने एकतर्फी निर्णय घेणे हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा तणावाच्या कडेला आले आहेत. भविष्यात या तणावात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता संपूर्ण जगाचे लक्ष या दोन्ही देशांमधील घडामोडीकडे लागले आहे.

Parinay Fuke : पाकिस्तानच्या प्रत्येक हस्तक्षेपाचा अंत हवा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!