
अचलपूरमध्ये खाजगी भूखंडावर खोदकाम करताना पालिकेचे जलवाहिनीचे पाईप सापडले आहेत. लाखो रुपयांचे हे पाईप जमिनीखाली दडलेले आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे.
अचलपूर शहरातील एका खाजगी भूखंडावर सुरू असलेल्या खोदकामात पालिकेच्या मालकीचे जलवाहिनीचे लोखंडी पाईप सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या पाईपची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि अपारदर्शक कारभाराचा नवा बुरखा फाटल्याचे चित्र नागरिकांमध्ये उमटले आहे.
कामगारांनी बांधकामाच्या पूर्वतयारीदरम्यान खोदकाम सुरू केले आहे. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात लोखंडी जलवाहिनी पाईप जमिनीखाली गाडलेले आढळले. हे दृश्य पाहून संबंधित कामगारही अवाक झाले. काही वर्षांपूर्वी शहरातील एका शाळेच्या संचालकाने पालिकेचे पाईप स्वतःच्या मालकीचे समजून सांडपाणी वाहिनीत वापरल्याचा प्रकार समोर आला. आता पुन्हा असेच प्रकार उजेडात येत असल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

चौकशीची गरज
नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांमध्ये पालिकेच्या मालकीचे लाखो रुपयांचे जलवाहिनी पाईप बेवारस अवस्थेत टाकलेले दिसतात. अनेक ठिकाणी ही पाईप सांडपाणी वाहण्यासाठी तर काही ठिकाणी शेतीसाठी वापरली जात आहेत. सार्वजनिक मालमत्तेचा असा बेजबाबदार आणि अवैध वापर होत असल्याने पालिकेच्या प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, पाईप जाणीवपूर्वक खाजगी ठिकाणी लपवण्यात आले की निष्काळजीपणामुळे तिथे राहिले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या अधिकार्यांनी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यावरून त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या मालमत्तेवर जनतेचा हक्क आहे, ती खासगी वापरासाठी वापरणे हा फक्त निष्काळजीपणा नाही तर भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. पालिकेच्या गलथान कारभारामुळे सरकारी मालमत्ता मातीमोल होत आहे. लोकांचा विश्वास ढासळत चालला आहे. यात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. यंत्रणेकडून चौकशी करून दोषी ठरविलेल्यांवर कठोर शासन करणे आवश्यक झाले आहे.
शहरात संतापाची लाट
घडलेल्या प्रकारानंतर अचलपूरमध्ये नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. अनेक सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. शहरातील विविध भागांतून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात आवाज उठवला जात आहे. जलवाहिनी पाईप प्रकरणात संपूर्ण तथ्य जनतेसमोर यावे, अशी मागणी जोर धरत आहे. पालिकेच्या मालकीच्या महत्त्वाच्या साधनांचा असा अपवापर शासकीय संस्थेच्या कार्यपद्धतीवरील विश्वासाला तडा देणारा प्रकार आहे. त्यामुळे या घटनेला केवळ एक छोटा अपघात समजण्याची चूक न करता, व्यापक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करणे हीच जनतेची एकमुखी मागणी ठरली आहे.