
अमरावतीच्या आकाशात इतिहास आणि श्रद्धेचा संगम घडवण्याची वेळ आली आहे. विमानतळाच्या नावासाठी संत गुलाबराव महाराज आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या गौरवयात्रेला वेग मिळाला आहे.
अमरावती विमानतळाच्या नावाच्या संदर्भात आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विमानतळाची नोंद व्हावी, अशी मागणी होत आहे. दुसऱ्या बाजूला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव माधान येथील श्री संत गुलाबराव महाराज संस्थानने पारित केला आहे.
संस्थानचे विश्वस्त रमेश मोहोड यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. साहेबराव मोहोड यांनी त्याला अनुमोदन दिले आहे. संस्थानने हा ठराव थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून अमलात आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अमरावतीच्या विमानतळाच्या नावावरून नव्या संघर्षाची नांदी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भव्य इतिहास
श्री क्षेत्र माधान हे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे मूळ गाव आहे. गुलाबराव महाराज यांना अल्पवयातच शारीरिक अंधत्व आले. मात्र त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, योगशास्त्र, संगीत, काव्य, आयुर्वेद आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा गाढ अभ्यास केला. केवळ 34 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 134 ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी माऊली संप्रदायाची स्थापना करून भक्ती आणि अध्यात्मिकतेचा नवा ध्यास दिला.
लोणी टाकळी या त्यांच्या जन्मगावाचा विमानतळाशी जवळचा संबंध असल्याने त्यांच्या नावाने विमानतळाला गौरवण्यात यावे, अशी भावना संस्थानने व्यक्त केली आहे. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म लोणी टाकळी येथे झाला, जे गाव अमरावती विमानतळापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रचंड बौद्धिक क्रांती घडवली. त्यांच्या कार्याचा विचार करता, विमानतळाला त्यांचे नाव देणे योग्य असल्याचे संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे म्हणणे आहे.
Tadoba Tiger Reserve : मचाण उपक्रमाच्या सावलीत जनजागृती हरवली
नवे समीकरण
शिक्षण आणि कृषी क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विमानतळाची नोंद व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यांच्या नावावर श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि अकोला येथील कृषी विद्यापीठ आहे. शेतकरी वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही आदरणीय मानले जाते.
संस्थानच्या विश्वस्त मंडळानेत्यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाच्या प्रश्नाला आता राजकीय व सामाजिक वलय प्राप्त झाले आहे.
अमरावती विमानतळाच्या नामकरणावरून उभे राहिलेले दोन भिन्न प्रस्ताव सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. एकीकडे संत परंपरेला गौरव देणाऱ्या गुलाबराव महाराजांच्या नावाची मागणी होत आहे, तर दुसरीकडे शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील आदरणीय कार्याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख यांचा गौरव व्हावा, अशी मागणी होत आहे. या नावाच्या संघर्षातून केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक समीकरणही नव्याने उभे राहताना दिसत आहे.