
भंडारा जिल्ह्यात महावितरणकडून “स्मार्ट प्रीपेड” मीटर लावणे सुरू झाले आहे. काही वीज ग्राहकांच्या घरामध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात आले. त्यामुळे वीज ग्राहकांचा मोठ्या संख्येने विद्युत कार्यालयावर मोर्चा धडकला.
राज्यात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’ विरोधात आंदोलन पेटले असताना महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात महावितरणकडून ग्राहकांना प्रीपेड मिटर लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याविरोधात भंडाऱ्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा महावितरण कार्यालयावर काढण्यात आला. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.

जिल्ह्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लाऊन भुर्दंड बसविण्याचा सपाटा सुरु आहे. स्मार्ट प्रीपेड विद्युत मिटर बसविल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना या प्रिपेड मिटरचा फटका बसणार आहे. यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. विद्युत वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वसुचना किंवा माहिती न देता घरामध्ये प्रमुख व्यक्ती नसतांना वीज वितरण कंपनीचे किंवा कंत्राटदाराचे व्यक्ती मीटर बदलवून घेत आहेत. अशा कृत्याचे बळी पडून जनसामान्यांना हे मीटर नकोसे आहे. या अनुशंगााने वीज ग्राहक संघर्ष समिती भंडाराच्या वतीने शहरातील राजीव गांधी चौकातून विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा धडकला आहे.
कोणीच नसताना लावले मीटर
आंदोलकांनी विद्युत कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून ठेवला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, असे मोर्चाचे संयोजक अजय मेश्राम म्हणाले आहेत. या आंदोलनाला संबोधित करताना अजय मेश्राम यांनी 26 तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. भंडारा विभागा अंतर्गत काही विद्युत ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यात आलेले आहे. याबद्दल सदर ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती देण्यात आली नाही. घरामध्ये कुणीही नसताना विद्युत कंपनीकडून मीटर बदलून दिले जात आहेत.
महावितरण कंपनीचे अधिकारी या धडक मोर्चाचा धसका घेत स्वत: निवेदन स्वीकारण्याकरिता आले. आंदोलकांची मागणी मान्य केली आणि तसे लेखी स्वरुपात दिले. त्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.
या मोर्चात अजय मेश्राम, माजी नगरसेविका जयश्री बोरकर, नितीन दुरुगकर, युवराज उके, सुनील बारई, संजय पंगवार, रामदास गिऱ्हेपुंजे, ब्रिजलाल बावणे, नरेंद्र पहाडे, श्रीकृष्ण आगाशे, संजय मते, विलास इटनकर, नितीन धकाते, नितीन चव्हान, राजू देसाई, आखाडू शेंडे, विनोद भुरे, नीलेश मदनकर, जयेश वाणेरकर, पांडुरंग गायधने, शमीम शेख, इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.