
केंद्र आणि राज्य सरकारशी उघड पंगा घेणाऱ्या बच्चू कडू यांनी शरीरातील रक्त काढत पुन्हा एकदा आंदोलन केलं आहे.
महायुती सरकार आणि केंद्र सरकारविरोधात माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आसूड व्यक्त केला आहे. परभणी येथे आंदोलन करीत कडू यांनी सरकारविरोधात रक्तदान केलं आहे. रक्तदान करीत त्यांनी दोन्ही सरकारचा निषेध नोंदविला आहे. यानंतरही सरकार वठणीवर आलं नाही तर आम्हाला रक्त सांडावं लागेल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी सरकार विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करण्या सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी महायुतीच्या विरोधातच मैदान लढविलं. मात्र त्यांचा स्वत:चा निवडणुकीत पराभव झाला. सध्या बच्चू कडू हे आंदोलनांमध्ये व्यस्त आहेत.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रक्तदान आंदोलन केलं. यावेळी ते म्हणाले की, सचिन बालाजी जाधव व त्यांची सात महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिन जाधव या तरुण दाम्पत्यानं आत्महत्या केली. या तरूण दाम्पत्याची ही आत्महत्या नाही. सरकारनं केलेलं हे तिहेरी हत्याकांड आहे. याबाबत अनेकांच्या मनात संताप, चीड आहे. परंतु लोक शांत आहेत. हिच हत्या जातीधर्माच्या वादात झाली असती तर दंगली भडकल्या असत्या. गावंचीगावं पेटली असती. सरकारच्या धोरणामुळं झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आपण रक्तदान केलं आहे.

Maharashtra : बोलता बोलता घोळ; बावनकुळेंचा राष्ट्रभाषा वक्तव्यावर यूटर्न
मृतकांच्या कुटुंबीयांचं सांत्वन
माजी आमदार बच्चू कडू यांनी सचिन व ज्योत्स्ना यांच्या परिवाराचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही सचिन व जोत्स्ना जाधव यांच्या घरी रक्तदान करून सरकारविरोधात राग व्यक्त करीत आहोत. रक्तदान करून केलेल्या निषेधातून सरकारनं योग्य तो धडा घेतला पाहिजे. सरकारची अक्कल ठिकाणावर आली नाही, तर आम्हाला रक्त सांडवावे लागेल. हे रक्त सांडण्याची वेळ कोणावरच येऊ नये अशी अपेक्षा आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवर सध्या बच्चू कडू वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलन करीत आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठवाड्यात मोठा मोर्चाही काढला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर बच्चू कडू यांनी पक्षाच्या भावी वाटचालीसाठी कार्यकर्त्यांकडून ‘फिडबॅक’ घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाची पुढची दिशा ठरविली आहे. सरकारसोबत जावं की विरोधकांसोबत असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला होता. आता बच्चू कडू हे सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे घेत सरकारचा निषेध करताना दिसत आहेत. मात्र सद्य:स्थितीत त्यांचा भर विदर्भाव्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांवर आहे. त्यामुळं बच्चू कडू यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.