
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत पुणे-संभाजीनगर सुपर एक्सप्रेसवे ची घोषणा केली. ज्यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या दोन तासांवर येणार आहे. कोट्यवधींच्या या महामार्गासाठी सरकारचा पैसा खर्च होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशातील विकास पुरुष म्हणून ओळखले जातात. नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण भारतात महामार्गांचे जाळे वेगाने विस्तारत आहे. विविध राज्यांमध्ये अनेक सुपरफास्ट एक्सप्रेसवे, ग्रीनफील्ड महामार्ग आणि नव्या वाहतूक सुविधांचा विकास होत आहे. महाराष्ट्रासाठीही गडकरींनी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे यांसारखे अनेक महत्त्वाचे मार्ग लवकरच पूर्णत्वास जात आहेत.
नितीन गडकरी यांनी याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला वेगाने जोडणाऱ्या पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) सुपर एक्सप्रेसवे ची घोषणा लोकसभेत केली आहे. हा महामार्ग केवळ दोन तासांत पुणे ते संभाजीनगर अंतर पार करण्यास मदत करणार आहे.

Sudhir Mungantiwar : ‛रयतेचं राज्य’ हा शब्दच लोकशाहीचा समानार्थी शब्द
सरकारला खर्च नाही
गडकरींनी सांगितले की, पुणे आणि संभाजीनगर (औरंगाबाद) यांना जोडणाऱ्या जुन्या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नवीन ग्रीनफिल्ड मार्गाची गरज होती. यासाठी 15 हजार कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग खासगी सहभागाच्या मॉडेलद्वारे उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी सरकारचा एक रुपया देखील खर्च होणार नाही, असे नितीन गडकरी म्हणाले. या प्रकल्पात महाराष्ट्र सरकारच्या एका महामंडळालाच हे काम देण्यात येणार आहे. सध्या पुणे-संभाजीनगर प्रवासासाठी 5 ते 6 तास लागतात. मात्र हा नवीन महामार्ग झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत हे अंतर पार करता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
परभणी आणि नांदेडसाठी नवीन महामार्गाच्या मागणीवरही गडकरींनी उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, इंदोर ते हैदराबाद हा नवीन महामार्ग तयार होत आहे, जो नांदेड मार्गे जाईल. त्यामुळे नांदेड आणि हैदराबाद यांच्यातील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर सुधारली जाईल. परभणी ते नांदेड या मार्गासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, भविष्यात वाहतूक वाढल्यास या मार्गाचा विस्तार केला जाईल, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
सभागृहात हशा
गडकरींनी महाराष्ट्रातील विविध महामार्ग प्रकल्पांची माहिती दिल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी हसत विचारले – ‘आता कोणता रस्ता बाकी आहे?’ त्यांच्या या मिश्किल प्रश्नावर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. गडकरींच्या नेतृत्वाखाली भारताच्या महामार्ग क्षेत्रात मोठी क्रांती घडत आहे. महाराष्ट्रासाठी हे नवे महामार्ग राज्याच्या आर्थिक वाढीला चालना देणारे ठरणार आहेत. पुणे-संभाजीनगर एक्सप्रेसवे, इंदूर-हैदराबाद महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे प्रवास जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.