
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर संशय आणि आरोपांची सावली मोठ्या प्रमाणावर दाटली आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली असून, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. याच आरोपांनी आगामी बिहार निवडणुकीतही याच प्रकारची घडामोडी होऊ शकतात, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. मात्र या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानेही आपले स्पष्ट मत मांडले आहे.
आयोगाच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी त्यांच्या आरोपांचे समर्थन करणारे कोणतेही औपचारिक पत्र किंवा संवाद आजवर आयोगाला दिलेले नाही. त्यामुळे आयोगाकडून कोणत्याही संवैधानिक प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष प्रतिसाद देणे शक्य झालेले नाही. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, राहुल गांधी यांनी जर खरंच गंभीर प्रश्न उपस्थित केले असतील तर त्यांना औपचारिकपणे पत्र लिहावे लागेल, तेव्हाच आयोग संवैधानिकदृष्ट्या योग्य प्रतिसाद देऊ शकतो. आयोगाच्या माहितीनुसार, राहुल गांधींच्या आरोपांमुळे आयोगाचे देशभरातील दहा लाखांहून अधिक बूथ लेव्हल अधिकारी, 50 लाख मतदान अधिकारी आणि १ लाख मतमोजणी पर्यवेक्षक मोठ्या प्रमाणावर खंत व्यक्त करत आहेत.

ईव्हीएमवर वारंवार आरोप
आरोपांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणावर आणि कठोर परिश्रमांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सीसीटीव्ही फुटेज बाबतही आयोगाने मतदारांच्या गोपनीयतेचा मुद्दा उचलला आहे. आयोगाने सांगितले की, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केवळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच केली जाऊ शकते. त्यामुळे राहुल गांधी किंवा त्यांच्या एजंट्सने या गोपनीयतेचा भंग करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. आयोगाचा सवाल आहे, राहुल गांधींना आता उच्च न्यायालयावर विश्वास नाही का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हटले की, ज्याला जनतेने नाकारले आहे, तो जनादेशच नाकारतो.
फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींचे धोरण लोकांना गोंधळात टाकण्याचे आहे, कारण त्यांना लोकांना समजावून सांगण्यात अपयश आले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. ते लोकशाहीची प्रतिमा खराब करण्यासाठी ईव्हीएमवर वारंवार आरोप करत आहेत.फडणवीसांनी विरोधी पक्षांच्या या आरोपांवर थेट निशाणा साधत म्हटले की, प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे विरोधी पक्षांना सवय झाली आहे. मात्र यापूर्वी संबंधित सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या आरोपांना कुठलाही कायदेशीर आधार नाही, असे ते स्पष्ट करत आहेत.
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींसाठी कोणताही निधी बेकायदेशीरपणे वळवला नाही
पारदर्शकतेसाठी संयम आवश्यक
निवडणूक आयोगाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, निवडणुकीचे निकाल तुमच्या बाजूने नसल्यानंतर असे आरोप करणे हास्यास्पद आहे. आयोगाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या आरोपांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि प्रामाणिकपणावर कोणताही प्रश्न उभा राहू नये, यासाठी संबंधित सर्व घटकांनी संयम आणि जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.अशा या वादग्रस्त निवडणूक आरोपांनी महाराष्ट्र आणि बिहारच्या आगामी निवडणुकांमध्ये राजकारण अधिक तापलेले आहे. यामध्ये कोणता नवा वळण येतो, ते पुढील काळात पाहावे लागेल.