
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ठाकरे यांनी केंद्र सरकारला ठाम आणि कठोर कृतीची मागणी केली आहे.
हल्ल्याची तीव्रता पाहता, मनसेने सरकारच्या निर्णयांना पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या प्रसंगी केंद्र सरकारच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभे राहण्याचा निर्धार केला आहे. राज ठाकरे यांनी या घटनेला फक्त हल्ला नव्हे तर भारताच्या अस्मितेवर आघात मानले आहे.

धाडसी कृतीची गरज
राज ठाकरे यांनी आपल्या विधानात 1972 मधील म्युनिक ऑलिम्पिकमधील इस्रायली खेळाडूंवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ दिला. त्या घटनेनंतर इस्रायलने पॅलेस्टिनी अतिरेक्यांना जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात शोधून संपवलं. तीच प्रेरणा भारतानेही घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारत आणि इस्रायलमधील सुसंवाद लक्षात घेता, केंद्र सरकारने या मार्गावर ठाम पावले टाकावीत, असा संदेश त्यांनी दिला आहे.
हल्ल्याच्या वेळी हल्लेखोरांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याचं एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितल्याचं राज ठाकरे यांनी संतापाने सांगितलं. अशा मनोवृत्ती विरोधात हिंदू म्हणून एकत्र येण्याची आणि प्रत्युत्तर देण्याची वेळ आली असल्याचा इशारा त्यांनी दिला. अशा मानसिकतेच्या मुळावरच घाव घालणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Chandrashekhar Bawankule : वर्ध्यात जिल्हाध्यक्षपदासाठी गट-संघर्ष उफाळला
बदललेला काश्मीर
काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर स्थिरता आणि पर्यटनात झालेली वाढ ही एक सकारात्मक झळक होती. मात्र अशा हल्ल्यांमुळे पुन्हा अस्थिरता निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो. भविष्यात गुंतवणूक करणाऱ्यांना अशा घटना परावृत्त करू शकतात, याकडे ठाकरे यांनी स्पष्टपणे लक्ष वेधलं.
राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की केंद्र सरकार कठोर पावले उचलेल यावर कोणतीही शंका नाही. अशा क्षणी सगळे राजकीय पक्ष केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या रांगेत अग्रेसर असेल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.