
गंगाजलातील प्रदूषण आणि अंधश्रद्धेविरोधी मतांवर राज ठाकरे यांची भूमिका योग्य असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना ठाम पाठिंबा दर्शवला.
अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकोणिसावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळाव्यातील गंगाजलाबाबत एक वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, मात्र यावर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले की, ‘मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे समर्थन करतो. प्रबोधनकार ठाकरे यांच्या सत्यशोधक चळवळीतून अंधश्रद्धेवर कठोर प्रहार करण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमधूनही वारंवार सांगण्यात आलं होतं की, कुणी ज्योतिषाकडे जाऊ नये.’ राज ठाकरेंनी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, फक्त वास्तव समोर मांडलं, असं मिटकरी यांनी स्पष्ट केलं.गंगानदीच्या प्रदूषणाबाबत राज ठाकरेंच्या विधानाला पाठिंबा देताना अमोल मिटकरी म्हणाले, 22 टक्के बॅक्टेरिया असलेल्या पाण्याला तीर्थ म्हणायचं का?” त्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि ही भूमिका स्वागतार्ह असल्याचं सांगितलं.

बीडमधील संताप
बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठा मोर्चा निघाला. देशमुख कुटुंबियांनी न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. विशेषत: काही लोक धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याच्या मागणीवर ठाम होते. स्थानिक आमदार आणि अजित पवार यांच्याकडे लोकांनी आपल्या भावना पोहोचवल्या.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला आहे. परंतु अंतिम निर्णय तपासानंतरच होईल. त्यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही आरोपाशिवाय कुणालाही दोषी ठरवू नये, आणि संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल.