
महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी वापरला जावा यासाठी मनसेने उभारलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मराठी भाषेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मातृभाषेतील संवाद हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असतो, आणि विशेषतः सरकारी बँकांमध्ये मराठीला प्राधान्य मिळाले पाहिजे, असा ठाम आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धरला होता. मात्र त्यांनी आग्रह आता घेतला आहे. त्यांनी आपल्या मनसे सैनिकांना आदेश दिले होते की राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन मराठीचा वापर होत आहे की नाही, याची तपासणी करावी आणि गरज भासल्यास बँकांना निवेदन द्यावे.
ठाकरेंच्या आदेशानंतर राज्यातील अनेक बँकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले आणि काही ठिकाणी गोंधळाच्या घटना देखील घडल्या. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर सुरू केलेले आंदोलन आता मात्र मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 5 एप्रिल रोजी एका पत्राद्वारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करण्यास भाग पाडायला हवे. आम्हालाही कायदा हातात घ्यायचा नाही. पण मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असे त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले.

Devendra Fadnavis : एमआयडीसी गावांना मिळणार औद्योगिक शहराचा दर्जा
सरकारी पातळीवर कामकाज
राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना आवाहन केले की, आता आंदोलन थांबवा, पण लक्ष हटवू नका. हा विषय केवळ आक्रमक आंदोलनावरच अवलंबून नाही तर जनतेच्या पाठिंब्यावरही अवलंबून आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी 5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांची भेट घेतली. बँकांमध्ये मराठी भाषा वापरण्याबाबत असलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. या चर्चेनंतर, राज्य सरकार सर्व संबंधित बँकांसोबत बैठक घेऊन मराठी व्यवहारांना प्राधान्य देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषेचा हा मुद्दा आता केवळ आंदोलनापुरता सीमित न राहता सरकारच्या पातळीवरही गांभीर्याने घेतला जाईल, असे दिसत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की, आम्ही पुरेशी जागृती केली आहे. मराठी भाषेचा अवमान केल्यास भविष्यात पुन्हा आंदोलन उभे राहील. त्यांचा हा इशारा सरकारसाठीही स्पष्ट संदेश आहे. बँका आणि इतर आस्थापनांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा मनसे सैनिक पुन्हा मैदानात उतरणार, असा इशाराही त्यांनी दिला. सध्या हे आंदोलन थांबविण्यात आले आहे.
Devendra Fadnavis : वक्फ जमीन घोटाळ्यात काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा हात