
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाकुंभ मेळ्यातील गंगाजल पिण्यास नकार देत या परंपरेवर तिखट शब्दांत टीका केली.
महाकुंभ मेळा हा श्रद्धा, परंपरा आणि आध्यात्मिक उर्जेचा महासंगम मानला जातो, पण यावेळी तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कुंभमेळा संपून काहीच दिवसांचा कालावधी उलटून गेला असला, तरी वाद हा सुरूच आहे. राजकीय नेत्यांच्या टीका, गंगेच्या स्वच्छतेवर उठलेले प्रश्न आणि विज्ञान विरुद्ध श्रद्धा याच्या चर्चांनी महाकुंभची पार्श्वभूमी आणखी गरम झाली आहे. महाराष्ट्रातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या तिखट शब्दांनी या वादाला अधिक धार दिली आहे. त्यांनी महाकुंभ स्नानाची खिल्ली उडवत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत, ज्यामुळे धर्म आणि राजकारणाच्या सीमारेषा पुन्हा एकदा धूसर झाल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडवली आहे. यावेळी त्यांनी थेट महाकुंभ मेळ्याच्या स्नानावरच ताशेरे ओढले आहेत. एवढंच नाही, तर आपल्या खास शैलीत त्यावर खिल्ली उडवत, अशा धार्मिक प्रथा आणि परंपरांना विचार करण्यासारखे सांगितले. मनसेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तिखट प्रतिक्रिया
सभेत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, मुंबईत एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, अनेक शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्ष गैरहजर राहिले. जेव्हा विचारणा केली, तेव्हा कळले की त्यापैकी पाच-सहा जण महाकुंभ मेळ्यात स्नानासाठी गेले होते. यावर राज ठाकरेंनी आपल्या शैलीत तिखट प्रतिक्रिया दिली. म्हटलं, मग गधड्यांनो, पापं कशाला करता? आणि परत आल्यावर आंघोळ तरी केली का? असा टोला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लगावला.
यावेळी त्यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावरही मिश्कील टिप्पणी केली. नांदगावकर यांनी महाकुंभातून कमंडलूमध्ये गंगाजल आणलं आणि ते राज ठाकरेंना दिलं. मात्र, राज ठाकरे यांनी सरळसोट नकार देत म्हटले, ‘हड, मी नाही पिणार, मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतोय बाया, पुरुष तिथे अंग घासत आहेत आणि मग हेच पाणी तुम्ही पिताय? कोण पिणार ते पाणी? वक्तव्य करतानाच त्यांनी कोरोनाकाळावरही टिप्पणी केली. दोन वर्षं लोक तोंडाला मास्क बांधून फिरत होते. आता मात्र, हजारोंच्या संख्येने एकाच पाण्यात डुबक्या मारत आहेत. स्वच्छतेचं काय? असा सवालही त्यांनी केला.
स्वच्छतेचा फुगा
राज ठाकरे यांनी गंगेच्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरले. या देशातील एकही नदी स्वच्छ नाही. आम्ही तिला ‘गंगा माता’ म्हणतो, पण पाणी मात्र गटारासारखं दिसतं. परदेशात स्वच्छ नद्या पाहायला मिळतात, पण तिथे कोणी त्यांना ‘माता’ म्हणत नाही. मग आम्ही का म्हणतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी थेट राजीव गांधी यांच्या काळापासून सुरू असलेल्या गंगा शुद्धीकरण मोहिमेवर टीका केली. ‘राजीव गांधींनी गंगा स्वच्छ करायची घोषणा केली होती. आज इतकी वर्षं झाली, पण गंगा स्वच्छ होईना. मधे राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट काढला, लोकांना वाटलं गंगा खरंच स्वच्छ झाली. पण तो वेगळाच प्रकार निघाला अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या योजना फसव्या असल्याचे सुचवले.
विज्ञानाचा स्वीकार करा
राज ठाकरे यांनी शेवटी स्पष्ट सांगितले की, या सगळ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा बाजूला ठेवून लोकांनी डोके वापरायला हवं. नदीत स्नान केल्याने पाप धुतले जातात हा कोणता विचार? गंगा माता म्हणायचं, पण तिला गटार बनवायचं? काहीतरी अक्कल ठेवा उगाच जुन्या प्रथांमध्ये अडकून पडू नका, असा जोरदार सल्ला त्यांनी दिला.
त्यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाकुंभासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यावर अशी टीका केल्याने हिंदू संघटनांची नाराजी होऊ शकते. पण राज ठाकरे त्यांच्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे ते अशा वादांची पर्वा करणार नाहीत, हे निश्चित.