
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत मुंबईत मनसेकडून जोरदार आंदोलन छेडण्यात आलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात मनसेने मुंबईच्या दादर परिसरात बॅनरबाजी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, अशा ठाम घोषणांसह मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन परिसरात बॅनर्स लावून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. या बॅनर्समधून सरळसरळ सरकारला आव्हान देण्यात आलं आहे. हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेने या आंदोलनासाठी एक पोस्टकार्डसदृश बॅनर तयार केले आहे. त्यात मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणाऱ्या काव्यमय ओळी वापरल्या आहेत. या बॅनरमधून मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांना थेट उद्देशून हिंदीकरणाच्या धोरणावर पुनर्विचार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या बॅनरमध्ये हिंदीकरणाच्या बळजबरीला मराठी साहित्य पुरून उरेल,असा संदेश देत, मराठी जनतेची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दक्षिणेत सक्ती नाही
राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? हिच सक्ती दक्षिणेकडील राज्यांमध्ये का नाही? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी दक्षिण भारतातील राज्यांनी अशा सक्तीला विरोध केला असता, तिथली सरकारंही पेटून उठली असती, असं सांगत महाराष्ट्र सरकारवर मूकपणे सर्वकाही स्वीकारल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरे यांनी सरकारवर भाषावादी संघर्ष निर्माण करण्याचा आरोप केला आहे. जेव्हा सरकारकडे दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेव्हा फोडा आणि राज्य करा हाच मंत्र वापरला जातो, असं ते म्हणाले. मराठी तरुण बेरोजगार आहेत, शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर आहेत आणि उद्योग महाराष्ट्र सोडून जात आहेत, हे वास्तव अधोरेखित करत त्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भरकटवलं जातंय, असंही नमूद केलं.
पुस्तकांच्या विक्रीवर रोख
राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमात हिंदी पुस्तकं विक्रीसाठी दुकानदारांना परवानगी देऊ नका आणि शाळांनीही ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू नयेत, असा आदेश त्यांनी मनसेच्या वतीने दिला आहे.
राज ठाकरे यांनी भाषावार प्रांतरचनेचा आदर राखण्याचा आग्रह केला आहे. प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. मराठी जनतेने जसं इतर राज्यांमध्ये तिथल्या भाषेचा मान राखावा, तसाच इथं मराठीचा सन्मान राखावा, असं म्हणत त्यांनी मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.