महाराष्ट्र

Raj Thackeray : सत्तेच्या रणांगणात दोन वंशांचे वादळ 

Maharashtra : 'ठाकरे-पवार' ब्रँड संपविण्याचा युद्धनाद 

Author

राज ठाकरे पुन्हा एका स्फोटक वक्तव्यांनी धडाकेबाज विधानांनी चर्चेत आले आहेत. ठाकरे-पवार या दोन राजकीय ब्रँड्सना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी पहलगाम हल्ल्यावरही भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या रोखठोक आणि स्पष्ट भाषणशैलीमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी दोन मोठे मुद्दे मांडले. एक म्हणजे ठाकरे आणि पवार या दोन आडनावांच्या राजकीय प्रभावावर भाष्य, आणि दुसरा म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेला खळबळजनक दावा. त्यांच्या या विधानांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघण्याची चिन्हं आहेत.

दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा होताना दोन आडनावं सातत्याने ऐकू येतात, ‘ठाकरे’ आणि ‘पवार’. या दोन घराण्यांचा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दीर्घकालीन प्रभाव राहिलेला आहे. मात्र, सध्याच्या राजकीय स्थितीत या दोन्ही ब्रँडना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हो, ब्रँड संपवण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे, पण मी लिहून देतो, हा ब्रँड कधीच संपणार नाही.

समाजसुधारणेचे प्रणेते

राज ठाकरे यांनी त्यांच्या घराण्याच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची आठवण करून दिली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारणेचे प्रणेते होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला. माझे वडील श्रीकांत ठाकरे यांचा संगीत क्षेत्रात मोठा वावर होता. त्यानंतर मी आणि उद्धव या दोघांचाही प्रभाव आहेच. एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा प्रभाव असतो, पण ‘ठाकरे’ हे आडनाव हेच एक मोठं वैभव आहे, असं त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं.

राज ठाकरे यांनी मुलाखतीत आणखी एक धक्कादायक दावा केला. त्यांनी सांगितलं की, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून काश्मीरबद्दल काही तरी विचित्र जाणवत होतं. “मला सतत वाटायचं की, काश्मीरमध्ये काहीतरी मोठं घडेल. एखादी दहशतवादी घटना, आणि विशेषतः पर्यटकांवर हल्ला होईल. हे मी अनेकांना बोललो होतो,” असं ते म्हणाले.

मला फोन आला…

आपली ही भावना ते मीडियासमोर का व्यक्त करत नव्हते, याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, राज ठाकरेने हिंट दिला किंवा सगळं सांगितलं, असं व्हायला नको म्हणून मी ही गोष्ट जाहीररीत्या कधी बोललो नाही. पण आता ही घटना घडल्यावर मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलतोय. याचबरोबर त्यांनी अनिल शिदोरे नावाच्या आपल्या सहकाऱ्याचा उल्लेख करत सांगितलं की, “ज्या दिवशी पहलगाम हल्ला झाला, त्या दिवशी शिदोरे यांचा मला मेसेज आला, ‘तुम्ही बोललात तसंच झालं’.” त्यांनी आपल्या मोबाईलमधील मेसेज दाखवण्याची तयारीही व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी हेही स्पष्ट केलं की ते कोणतेही राजकीय फायदे मिळवण्यासाठी हे बोलत नाहीत. मी भविष्यवेत्ता नाही, पण माझे काही ठोकताळे आहेत. आतून काही जाणवतं ते मी व्यक्त करतो. हे सगळं मी निवडणुकीसाठी किंवा प्रसिद्धीसाठी बोलत नाही. मी जे बोलतोय, ते मनापासून बोलतोय,” असा ठाम दावा त्यांनी केला. या मुलाखतीनंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा चर्चेचं केंद्र गाठलं आहे. ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ या दोन राजकीय घराण्यांचे ब्रँड संपवण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका, आणि पहलगाम हल्ल्याबाबतच्या त्यांच्या जाणिवा, या दोन्ही गोष्टींनी राजकारणात आणि समाजात नवी चर्चा सुरू झाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!