
राज्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. भाजप हे रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची शक्यता. काही दिवसांपासून या दोघांच्या संभाव्य एकत्र येण्यावर तुफान चर्चा रंगली असून, राज्यातील राजकीय पारडे या चर्चेमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. दोन्ही ठाकरे गटांकडून अद्यापही याबाबत अधिकृत घोषणाही आलेली नसतानाही, राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी मात्र या युतीबाबत आशावाद व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत भाजपवर आरोप केला की, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत, यासाठी भाजप शर्थीचे प्रयत्न करत आहे. भाजपवर घराघरात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा आरोप करत, ते म्हणाले, राज आणि उद्धव जर एकत्र आले, तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना तब्बल 54 टक्के मते मिळतील, असा एक सर्व्हेही स्पष्ट सांगतो. त्यामुळेच भाजप घाबरून गेले आहे. पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपवर आणखी घणाघात केला. शरद पवार गट भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, अशी एक चर्चा आहे.

संघाचा पक्षपाती प्रचार
भाजपकडून नेहमीच विरोधी पक्षातील आमदार-खासदारांबाबत अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे भाजपबद्दल जनतेच्या मनात नकली प्रेम निर्माण करण्याचा हा नवा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टीका करत सांगितलं, संघ नेहमी भाजपच्या बाजूने प्रचारासाठी उतरतो. सर्व धर्म, जातींना चुचकारायचं आणि प्रचार मात्र भाजपचा करायचा हा दुटप्पीपणा जनतेला आता स्पष्ट जाणवतो आहे. तसेच त्यांनी टोला हाणला की, पूर्वी दोन गुजराती नेत्यांचं महाराष्ट्रावर लक्ष होतं, आता ते तीन झाले आहे, पण त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळेलच.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचा पक्ष चमत्कार घडवेल, असा आत्मविश्वासही भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. आम्हाला आमच्या ताकदीचा अंदाज आहे. यापूर्वी योग्य संधी मिळाली नाही. पण आता आमचे कार्यकर्ते सज्ज आहे. ते हवेत गोळीबार करणारे नाही. जमिनीवर काम करणारे लोक आहे, असे ते म्हणाले. सहा महिन्यांपूर्वी आम्ही 151 प्रभागांचा आढावा घेतला आहे. वस्तुस्थिती समजून घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगत जाधव यांनी नागपूरमध्ये राजकीय चमत्कार घडवण्याचे संकेत दिले.
Nagpur : महाराष्ट्रात होणार पहिला हेलिकॉप्टर स्वप्नांचा कारखाना
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकारणात नवा रंग भरला जात आहे. भाजपच्या रणनीती, संघाचा हस्तक्षेप आणि महानगरपालिका निवडणुकींची रणधुमाळी यामुळे आगामी काळात राजकीय समीकरणं कशी बदलतील, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.