महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसेच्या मुख्य ‘इंजिन’ चालकाकडून भैय्याजींबाबत ‘चेन पुलिंग’

RSS : राज ठाकरेंच्या संतप्त भूमिकेने वातावरण तापलं

Author

भय्याजी जोशींच्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या अस्मितेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, पण राज ठाकरे यांच्या आक्रमक प्रतिकाराने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. गुढीपाडव्याच्या आधीच मनसेने एल्गार पुकारल्याने मराठी स्वाभिमानाचा ज्वर उफाळून आला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं वक्तव्य करताच महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, जोशींना थेट इशारा दिला आहे. मराठी अस्मितेवर वार करणाऱ्या कोणालाही माफ केलं जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी भारतीय जनता पक्षालाही जाब विचारला आहे.

राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकारावर ताशेरे ओढताना जोशींच्या विधानामागील राजकीय हेतू उघड करत, भाजपला देखील धारेवर धरले आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी जनतेच्या संघर्षातून घडला आहे आणि या भूमीत मराठी भाषा गौण समजणाऱ्या कोणालाही येथे स्थान असू शकत नाही, असे ते ठासून सांगत आहेत. त्यांच्या या संतप्त भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Atul Londhe : मुंबईत मराठी नको, मग तुम्हीच गुजरातला शिफ्ट व्हा

मनसेचा एल्गार

मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळाली आहे, हे भय्याजी जोशी विसरू शकत नाहीत. मात्र तरीही असे मराठीविरोधी वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाव घातला आहे. हे विधान निव्वळ एका विशिष्ट राजकीय अजेंड्याचा भाग आहे. एमएमआर क्षेत्रातील प्रचंड विकासकामे आणि त्यामागील राजकीय डावपेच आता स्पष्ट होत आहेत. मुंबईत बाहेरच्या लोकांची घुसखोरी वाढवून स्थानिक मराठी माणसाला कोपऱ्यात लोटण्याचे हे नियोजनबद्ध षड्यंत्र आहे. जोशींच्या वक्तव्याने या कटाचा पर्दाफाश झाला असून, हा मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला असल्याचे राज ठाकरे ठामपणे सांगतात.

भाजपची भूमिका संशयास्पद

राज ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाजपच्या भूमिकेवर देखील जोरदार टीका केली आहे. जर हेच विधान अन्य राज्यात कोणी केले असते, तर तिथल्या सरकारने आणि लोकांनी त्याला जबरदस्त विरोध केला असता. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेतृत्त्व या विधानावर गप्प का आहे? यावरून भाजपचाही हेतू संशयास्पद असल्याचे राज ठाकरेंनी सूचित केले आहे. भाजप सरकार सतत मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम करत आहे. उद्योग बाहेर नेण्याचा डाव, नोकरभरतीत मराठी तरुणांवर अन्याय, आणि आता मुंबईत मराठी भाषा दुय्यम ठरवण्याचा हा प्रयत्न, हे सगळे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. भय्याजी जोशी हे केवळ एक निमित्त आहेत, पण सूत्रधार काही वेगळेच असल्याचे राज ठाकरे यांनी इशार्‍यातून स्पष्ट केले आहे.

गुढीपाडव्याला मनसेचा निर्णय

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या वतीने यावर मोठा एल्गार केला जाणार आहे. जोशींच्या या विधानाचा तीव्र निषेध करत, मराठी अस्मिता आणि मुंबईच्या स्वाभिमानासाठी मनसे आक्रमक भूमिका घेणार आहे. हा लढा केवळ एका विधानाचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, आणि मनसे हे कधीही सहन करणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. भय्याजी जोशींनी हे विधान करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे. ब्रिटनचा गायक ख्रिस मार्टिन देखील मुंबईत मराठीत बोलतो, पण एका स्वयंसेवक संघाच्या मोठ्या नेत्याला ही गोष्ट कळत नाही. हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असून, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने याची दखल घेतली पाहिजे, असे राज ठाकरेंनी सांगितले.

कठोर प्रत्युत्तराची गरज

राज ठाकरेंच्या या घणाघाती टीकेनंतर आता महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जोशींना आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या प्रवृत्तींना आता करारा जवाब द्यायची वेळ आली आहे. राज ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहता, गुढीपाडव्याच्या सभेत मनसे कोणता मोठा निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मराठी अस्मितेवर घाव घालणाऱ्या प्रत्येकाला मनसेचा लढा सहन करावा लागेल, आणि जोशी यांचे हे विधान मराठी माणूस कधीही विसरणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!