
महाराष्ट्राच्या राजकीय रंगभूमीवर मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या राजकुमार बडोले यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.
मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात आर्थिक धोरणे, सामाजिक प्रगती आणि प्रशासकीय बदल या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना चर्चा होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपदाबाबत रस्सीखेच सुरू आहे. आघाडीतील विविध गटांमध्ये या विषयावर मतभेद दिसत आहेत. यामुळे अधिवेशनाच्या कामकाजात आणखी रंगत आली आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गुटातील एक प्रमुख नेत्याला विधानसभा अध्यक्षपद सोपविण्यात येणार आहे. या निर्णयातून अजितदादा अनेक नवी राजकीय समिकरणं साधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राजकुमार बडोले यांचे नाव विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी मुख्य उमेदवार म्हणून समोर आलं आहे. बडोले हे यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री होते. अजित पवार यांच्या या निर्णयामुळं अनुसूचित जाती प्रवर्गातील एका नेत्याला मोठं पद मिळणार आहे.

Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ
लवकरच निर्णय
अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात येणार आहे. याशिवाय विधान सभेच्या विरोधी पक्षनेते पदावरही नियुक्ती होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव या पदासाठी आल्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कदाचित प्रतिकूल निर्णय देतील असं सांगण्यात येत आहे. काँग्रेसचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळं विजय वडेट्टीवार यांच्या नावाला सगळ्यांचीच पसंती आहे. असं झाल्यास मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि विधानसभा उपाध्यक्ष तीनही पदं विदर्भाला मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे भूमिका जाहीर केली होती. राजकुमार बडोले यांना उपाध्यक्ष पद मिळाल्यास ते पुन्हा एकदा राजकीय ‘फ्लो’मध्ये येणार आहेत.
सडक अर्जुनीचं प्रतिनिधीत्व करणारे राजकुमार बडोले हे सिव्हिल इंजिनीअर आहेत. बडोले राज्याच्या सिंचन विभागातही सेवेत होते. त्यानंतर त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी सडक अर्जुनी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांना फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री पद मिळालं होतं. गोंदिया जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील होते. त्यानंतर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून विजय मिळाविला. काँग्रेसचे दिलीप बनसोड यांचा त्यांनी पराभव केला. आता त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळणार आहे. सध्या विधानसभेचे अध्यक्ष पद भाजपकडं आहे. विधान परिषदेचे उपसभापती पद शिवसेनेकडे आहे. आता विधानसभा उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसकडं जाणार असल्यानं महायुतीमधील तीनही पक्षांना समतोल न्याय मिळणार आहे.