
रामदास आठवलेंनी भाजपवर निशाणा साधत टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकच मंत्रिपद उरल्याने आरपीआयला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी पुन्हा मांडली.
महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या वरिष्ठ आमदारांपैकी एक असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना राज्याच्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही. त्यावरून रामदास आठवले यांनी थेट भाजपच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, एक अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या अनुभवी आणि समर्पित आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे होते. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी त्यांच्यासाठी अन्याय झाला. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं. त्यांच्या कामाचा अनुभव आणि जनाधार विचारात घेतल्यास, हा निर्णय समजण्यास कठीण आहे, असं मत व्यक्त करत आठवलेंनी अप्रत्यक्षपणे भाजपच्या अंतर्गत गोटातील असंतोषाला वाचा फोडली.

Bhandara : गोसेखुर्दच्या कालव्याचा मूड स्विंग, केव्हा फुटेल काही नेम नाही
मंत्रिपदाची मागणी
रामदास आठवलेंनी महायुती सरकारमध्ये सध्या एकच मंत्रीपद रिक्त असल्याचं अधोरेखित करत, त्या जागेवर दलित समाजाचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी करण्याची ठाम मागणी पुन्हा मांडली. “आता फक्त एक मंत्रिपद उरलं आहे, तर तिथे दलित मतांचा आणि आमच्या पक्षाचा विचार व्हावा. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे,” असं ठामपणे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
मुंबईत आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीतही आठवलेंनी महत्त्वाचा सूर आळवला. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर महायुतीकडून आम्हाला सन्मानाचा वाटा दिला गेला नाही, तर आम्ही आमचा मार्ग स्वतंत्र ठरवू शकतो,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
राणेंना सल्ला
भाजप मंत्री नीतेश राणे यांनी झटका प्रमाणित मटण विक्रीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर देखील आठवले आपल्या खास शैलीत म्हणाले, “झटका असो किंवा हलाल, मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्याने करा, पण एवढी हार्ड भूमिका घेऊ नका,” असा सल्लाही त्यांनी दिला.
एकंदरित, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी भाजपच्या निर्णयशक्तीवर बोट ठेवत, स्वतःच्या पक्षाचा मंत्री करण्याची मागणी अधिक ठामपणे मांडली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये येणाऱ्या काळात अंतर्गत असंतोषाचा धुरळा अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.