
महायुतीच्या राजकीय नाट्यात आमदार रवी राणा यांनी एक ठोस खेळी करत अमरावतीच्या सत्तासमीकरणाला नवा वळण दिला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबतच युती करून लढण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला.
राजकीय व्यासपीठावर सतत चर्चेत असलेले आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा आपल्या ठाम आणि सुस्पष्ट भूमिकेने अमरावतीच्या राजकारणात हलचल निर्माण केली आहे. शेगाव नाका येथील अभियंता भवनात आयोजित युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना त्यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपसोबत युती करत लढण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष महायुतीचा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शब्दानुसार, अमरावती महापालिकेवर भाजपचाच महापौर आणि जिल्हा परिषदेतही अध्यक्ष भाजपचाच असणार आहे, असा ठाम दावा राणा यांनी केला.
रवी राणांच्या या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणे चांगलीच तापली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी राणा महायुतीत असल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे जाहीर करत राजकीय समिकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर रवी राणांचा खुला पवित्रा महत्त्वाचा मानला जातो आहे.

एकजूट अबाधित
रवी राणा पुढे म्हणाले, मी युवा स्वाभिमान पार्टीचा आमदार आहे आणि नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षांत असलो तरी ध्येय मात्र एकच आणि ते म्हणजे महायुतीचा विजय. एकाच घरात दोन पक्ष असले तरी आमची एकजूट अबाधित आहे. यात कोणताही गोंधळ किंवा विरोधाभास नाही, असे सांगत राणांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी फक्त आणि फक्त भाजपसोबत युती करूनच रिंगणात उतरणार आहे, असेही राणांनी ठणकावून सांगितले. “आपला पक्ष छोटा असला तरी आम्ही मोठ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती होणार नाही, हे मी आज पुन्हा स्पष्ट करत आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
विनंतीमुळे संयम बाळगला
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत राणा म्हणाले, त्या वेळी जर मी थोडा जोर लावला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा दहा हजार मतांनी पराभव झाला असता. पण महायुतीचा धर्म राखण्यासाठी आणि नेत्यांच्या विनंतीमुळे मी संयम बाळगला. त्या वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे मला फोन आले होते, ही गोष्ट मी विसरू शकत नाही.
अंतिम टप्प्यात राणांनी विरोधकांवर जोरदार शब्दबाण सोडले. “ज्यांना राजकारणात बिनधास्त वाटते, त्यांनी आधी स्वतःचा आत्मपरीक्षण करावे. ब्राऊंड्रीवर पोहोचणाऱ्यांनी मोजून बोलावे. आम्ही संयम बाळगतो म्हणून कोणी आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये,” असा इशारा देत राणांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या भाषेतील संकेत स्पष्टपणे कुणाच्या दिशेने होते, हे उपस्थितांना कळले.
रवी राणांचा हा राजकीय डाव महायुतीतील पुढील हालचालींवर मोठा परिणाम घडवू शकतो, हे निश्चित. अमरावतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी आता सुरू झाली असून, महापालिका निवडणुकीच्या आधीच राजकीय भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.