
अकोल्याच्या पोलिस विभागात लवकरच मोठे फेरबदल होणार असून, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी शिस्तीची नवी लाट आणण्याची तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी निर्मूलन, विभागीय स्वच्छता आणि जनतेचा विश्वास ही त्यांची तीन सूत्रं ठरणार आहेत.
पोलीस अधीक्षक बदलला, म्हणजे नवा गडी नवा राज, ही म्हण अकोल्यात आता नव्या अर्थाने खरी ठरतेय. नागपूरसारख्या महानगराला ट्रॅफिकमुक्त बनवणारे आणि कायदा-सुव्यवस्थेत नाव कमावलेले आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी अकोल्यात पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारताच वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेतील काही विभाग लवकरच नव्याने आखले जाणार आहेत आणि त्यात सर्वात आधी गाजतं नाव आहे, स्थानिक गुन्हे शाखा.
स्थानिक गुन्हे शाखेत गेल्या काही काळापासून एकाच गटातील कर्मचाऱ्यांचे वर्चस्व आहे. या कर्मचाऱ्यांवर काही असामाजिक घटक आणि माफिया साखळ्यांशी संबंध असल्याचे गंभीर आरोपही झाल्याचं समजते. काही गोष्टी थेट चांडक यांच्या कानावरही गेल्या आहेत. त्यामुळेच आता एलसीबी, विशेष शाखा, वाहतूक विभाग आणि गुप्तचर पथकांमध्ये ‘शिस्तीचं स्ट्रक्चर’ पुन्हा उभं करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.

खरी रणनीती
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन प्रहार’ राबवून गुन्हेगारीच्या कडेलोटाची सुरुवात केली. ही मोहीम केवळ देखावा नसून, जिल्ह्याला दंगलखोर, अवैध धंदे, मटका अड्डे, गुटखा, गोवंश तस्करी आणि दारू माफियांपासून मुक्त करण्याची वैचारिक रणनिती आहे. चांडक यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला स्पष्ट आदेश दिले आहेत. सावध राहा, गोंधळ खपवून घेतला जाणार नाही.
अर्चित चांडक यांनी नागपूरमध्ये वाहतूक उपायुक्त असताना केलेल्या सुधारणा आजही चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यकाळात नागपूर ट्रॅफिकने एकप्रकारे नवा श्वास घेतला होता. आता अकोल्यात देखील अशीच अपेक्षा आहे, अरुंद रस्ते, गोंधळाची वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण. ‘द लोकहित लाईव्ह’ने त्यांच्या नागपूर कार्यकाळावरील विशेष वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक अकोलावासियांनी थेट चांडक यांची भेट घेऊन वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती.
धोरण स्पष्ट
अकोल्यात पोलीस दलात दरवर्षी काही प्रमाणात बदल होतात. पण यावेळचा बदल हा केवळ प्रशासनिक न राहता, व्यवस्थेचा शुद्धीकरण सोहळा ठरणार आहे. फक्त चेहऱ्यांमध्ये नाही, तर मानसिकतेतही बदल घडवायचा, असा दृढ निर्धार अर्चित चांडक यांनी व्यक्त केला आहे. अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाचा फोकस तीन महत्त्वाच्या पातळ्यांवर केंद्रीत आहे. सर्वप्रथम, विभागीय फेरबदल, जिथे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता, पारदर्शकता आणि निष्ठेच्या आधारे बदली केली जाणार आहे, जेणेकरून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी कार्यरत राहील.
दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे गुन्हेगारी निर्मूलन ज्यामध्ये केवळ वरवरची कारवाई न करता थेट अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आणि तिसऱ्या पातळीवर, जनतेचा विश्वास परत मिळवणं, ज्यासाठी पोलिस दलात उत्तरदायीत्व आणि पारदर्शकतेची भावना रुजवण्यावर त्यांचा कटाक्ष राहणार आहे. या तिन्ही अंगांनी अकोल्यातील पोलिसिंगचा चेहरामोहरा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची छाननी
सध्या अर्चित चांडक यांच्या लक्षाचे केंद्रबिंदू काही विशिष्ट विभाग ठरत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) येथे सर्वाधिक बदल अपेक्षित असून, येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची नव्याने छाननी होणार आहे. विशेष शाखेला गुप्त माहिती संकलनासाठी अधिक प्रभावी बनवण्याच्या दृष्टिकोनातून, गुप्तचर यंत्रणेचं भक्कम जाळं उभारण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक विभाग हा देखील त्यांच्या प्राधान्यक्रमात असून, अकोल्यातील अरुंद रस्त्यांवर शिस्त लावणे आणि वाहतुकीची गती सुरळीत करणे हे मुख्य उद्दिष्ट राहील. पोलीस ठाण्यांतील गुप्तचर पथकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत, ताज्या मानसिकतेची आणि कार्यक्षम यंत्रणा उभी करण्यावर भर दिला जाणार आहे.
राजकीय हस्तक्षेप, पोलिसांमधील गटबाजी, तसेच स्थानिक पातळीवरील दबाव टाळून एक निर्भय आणि पारदर्शक पोलिसिंग अकोल्यात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अकोल्यात गुन्हेगारांच्या गल्लीला टाळं, आणि जनतेच्या मनात विश्वासाचं कुलूप लावण्याचा हाच योग्य क्षण आहे. पोलीस खात्यातील कर्मचारी, अधिकारी आणि जनतेचेही लक्ष आता अर्चित चांडक यांच्या पुढील पावलांवर आहे. उद्या एखादं नाव बदलीत दिसलं, किंवा एखाद्या ठाण्यात नवा चेहरा दिसला, तर समजून घ्या “ऑपरेशन शिस्त” सुरू झालंय.